मुंबई-पुणे व्यतिरिक्तही महाराष्ट्र आहे; फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला
मुंबई – राज्यात झपाट्याने वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता ठाकरे सरकारने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आज, बुधवारी रात्री ८ वाजल्यापासून पुढील १५ दिवसांसाठी राज्यात संचारबंदी जाहीर केली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी राज्यातील जनतेशी संवाद साधत संचारबंदी लागू करत असल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी आर्थिक दुर्बल घटकांना दिलासा देण्यासाठी अन्नधान्य आणि अर्थसाह्य देण्यात येईल अशी माहिती दिली. यावरून विधानसभा विरोधी पक्षनेते देंवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मुंबई-पुणे व्यतिरिक्तही महाराष्ट्र आहे असा टोला त्यांनी लगावला असून सरकारने जाहीर केलेलं पॅकेज ही निव्वळ धूळफेक असल्याचेही ते म्हणाले आहेत.
‘कडक निर्बंध लावणार असाल तर विविध घटकांना मदत केली पाहिजे पण सरकारने जाहीर केलेलं पॅकेज ही निव्वळ धूळफेक आहे. याचं कारण ३३०० कोटींची तरतूद करोनासंदर्भात सांगण्यात आली आहे ती नियमित बजेटमधील तरतूद आहे जी वर्षभरात खर्च होणार आहे. त्यामुळे सध्या वाढणाऱ्या करोनासाठी ही तरतूद नाही’, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच ‘अन्न सुरक्षा योजनेत अतिरिक्त देण्यात येईल असं सांगण्यात आलं असून यामध्ये काही कठीण नाही. त्यांना सगळं केंद्र सरकार देतं. जवळपास ८८ लाख लोक अन्न सुरक्षा योजनेत नाहीत पण गरीब आहेत. २०११ मध्ये झालेल्या चुकीच्या सर्व्हेमुळे महाराष्ट्रात अन्न सुरक्षा योजनेत आले नाहीत. खरा दिलासा त्यांना द्यायला हवा होता. पण सरकारने त्यांच्यासाठी कोणतीही घोषणा केली नाही’, असेही फडणवीस म्हणाले.
‘मुंबई आणि पुणे ही आपली महत्त्वाची शहरं आहेत त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे पण मुंबई-पुण्याच्या बाहेरही महाराष्ट्र आहे हे या सरकारला माहितीच नाही. त्यामुळे नागपूर, नाशिक, औरंगाबाद येथे आरोग्य व्यवस्था वाढवण्यासंदर्भात सरकारकडून कोणतीच कृती होताना दिसत नाही. गेल्यावेळीही नागपूरला कोणती व्यवस्था केली नाही, आजही नागपूरची स्थिती वाईट आहे त्यामुळे आलो आहे. जितकी शक्य तितकी मदत करणार आहे पण सरकार कोणतीही मदत किंवा पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पुढाकार घेताना दिसत नाही’, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
त्याचबरोबर ‘सरकार किती बेड्स, व्हेंटिलेटर वाढवणार यासंबंधी माहिती देण्याची अपेक्षा होती. अनेक घटकांना सरकारने कोणतीही मदत केलेली नाही. शेतकरी, मजूर, बारा बलुतेदार, केशकर्तनालय, छोटे उद्योग…कोणालाही कोणती मदत केलेली नाही. दिशाभूल करण्यात आली आहे. वृद्धापकाळ, श्रावणबाळ या केंद्र सरकारच्या योजना आहेत. यामध्ये सरकार अतिरिक्त १००० रुपये देईल असं वाटलं होतं. एकही नवीन पैसा मिळत नसून आगाऊ पैसा देत आहेत’, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. तर आदिवासींना २००० रुपये खावटी अनुदान म्हणजे तोंडाला पानं पुसण्यासारखं आहे, अशी टीका त्यांनी केली.