मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत? अजित पवार म्हणाले..
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या अधिकार क्षेत्रातील समितीचा आढावा घेतला. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात कोल्ड वॉर सुरू असल्याचं बोललं जात आहे. त्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अर्थमंत्री म्हणून मी विकास कामांचा, प्रकल्पांचा आढावा घेऊ शकतो. तुम्हाला काय त्रास? असं अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले की, अनेकदा राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांचा पाठपुरावा करण्यासाठी १५ दिवसाने आढावा बैठक घ्यायचो आणि त्याला गती द्यायचो. आताही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत. फडणवीस आहेत. इतर सहकारी आहे. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यावर या कामांचा आढावा घेण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. त्याचा आढावा ते घेत असतात. राधेश्याम मोपलवार यांना त्या समितीची जबाबदारी दिली आहे. वास्तविक आम्ही सरकारमध्ये कशाला गेलो? महाराष्ट्राचा विकास व्हावा म्हणून गेलो. लोकांचे प्रश्न सुटावेत यासाठी गेलो. वेगवेगओळ्या प्रकारच्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून गेलो. हे सर्व करत असताना देश पातळीवर मोदींना सपोर्ट करण्यासाठी गेलो.
हेही वाचा – Pune : चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे आज लोकार्पण!
अर्थमंत्री म्हणून मी आढावा घेऊ शकतो. फायनल निर्णय मुख्यमंत्र्यांचाच असतो. मोपलवारही बैठकीला होते. पण काहींना वेगळ्याच बातम्या चालवल्या. हे असं झालं, ते तसं झालं. तुम्हाला काय त्रास होतो? जर राज्याचे प्रश्न… मेट्रोचे प्रश्न मार्गी लागत असेल तर काय अडचण आहे. थोडीशी यंत्रणा हलवली तर कामे होतात. पॉलिटेक्निक, महावितरण आणि खासगी जागेचे प्रश्न होते. त्याचा आढावा घेतला. सर्वांनी बसलं तर अडचणी मार्गी लागतात. त्यामुळेच मी आढावा घेतला. शेवटी कुणाचंही सरकार असलं तरी मुख्यमंत्रीच त्यावर अंतिम निर्णय घेतात. ही गोष्ट ध्यानात घ्या. लोकांची कामे व्हावेत त्यासाठी आम्ही लक्ष देत आहोत. तुम्ही काम रखडलं तर सांगा. आम्ही लक्ष देऊ ना. राज्याचा विकास व्हावा हा आमचा हेतू आहे, असं अजित पवार म्हणाले.
१५ ऑगस्टरोजी पुण्यात ध्वजारोहण कोण कराणार? असा प्रश्न विचारला असता. ते म्हणाले की, मी अनेक वर्ष या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. आपल्याकडे अनेक वर्षापासून १५ ऑगस्टचं झेंडा वंदन राज्यपालच करतात. इथे कधीही १५ ऑगस्टचं झेंडा वंदन पालकमंत्री करत नाहीत. १ मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचं ध्वजारोहण पालकमंत्री करतात. २६ जानेवारीचं ध्वजारोहण पालकमंत्री करतात. २६ जानेवारीला पुण्यता मी ध्वजारोहण केलं. गिरीश बापटांनी केलं. चंद्रकांत पाटील यांनीही केलं. पण तुम्ही लगेच उलट्या बातम्या चालवल्या. क्षुल्लक कारणाचा बाऊ केला. तुम्ही माहिती घ्या. वर्षानुवर्षाची परंपरा आहे. ती जाणून घ्या. कुणाला कुठे ध्वजारोहण करण्याची जबाबदारी द्यावी हा राज्याच्या प्रमुखांचा अधिकार आहे. वेगवेळ्या मंत्र्यांना झेंडा वंदनाची जबाबदारी देण्यात आली आहे. माहिती घ्यायची नाही, रुसवे, फुगवे सांगतात. कुणाचा रुसवा आणि कुणाचा फुगवा? कुणी तुम्हाला रुसून सांगितलं. कुणी फुगून सांगितलं. चुकीच्या बातम्या देऊ नका, असंही अजित पवार म्हणाले.