‘नरेंद्र मोदी हे देशाला धोकादायक, त्यांना..’; प्रकाश आंबेडकर यांचे विधान
मुंबई : मणिपूरच्या मुद्द्यावरून विरोधकांनी मोदी सरकारला चांगलच घेरलं आहे. विरोधकांकडून केंद्र सरकारवर वारंवार टीका केली जात आहे. दरम्यान, यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच आपण आगामी लोकसभा अकोल्यातूनच लढणार असल्याचे देखील त्यांनी म्हटलं आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, भाजपविरोधी तयार झालेल्या आघाडीत एसटी, एससी, ओबीसी नाहीत. माझ्यासारखे भाजपाविरोधात असणारे तुम्ही का घेत नाहीत? मुंभत भाजपविरोधी पक्षांची बैठक होणार आहे. या बैठकीचे मला कोणतेही निमंत्रण नाही. मुंबईतील बैठकीत निमंत्रणाची मी वाट बघत आहे. दरम्यान, माझे राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्याशी घरगुती संबंध होते. तसेच अशोक चव्हाण यांच्याशी देखील घरगुती संबंध आहेत. त्यांच्याशी राजकारणापलिकडचा संवाद असल्याचे आंबेडकर म्हणाले.
हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत? अजित पवार म्हणाले..
मणिपूरच्या मुद्द्यावरून प्रश्न विचारला असता प्रकाश आबेडकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला धोकादायक झाले आहेत. त्यांना समर्थन देणाऱ्या हिंदू संघटनांनी फेरविचार केला पाहिजे. मोदींनी मणिपूरमध्ये मैतेई जातीला आदिवासींचा दर्जा का दिला? तशी मागणी होती का? हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलं पाहिजे.
महाविकास आघाडीत समावेश करण्यासंदर्भातील जबाबदारी उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. ते भूमिका पार पाडतील. उद्धव ठाकरे शब्दांचा पक्का माणूस आहे. ते छान बोलतात, कमी बोलतात, पण ठोस बोलतात. औरंगजेबाच्या मजारीसंदर्भात आंबेडकर म्हणाले की, आम्हाला दंगल थांबवायची होती. म्हणून तिथे गेलो, म्हणूनच दंगली थांबल्या.