“मला अंधारात ठेवलं, पण रोहित-विराटसोबत ते करू नका!” युवराज सिंगने व्यक्त केली खंत

Yuvraj Singh | भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या एकदिवसीय (ODI) कारकिर्दीबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि संघ व्यवस्थापनाने अत्यंत स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी ठाम मागणी केली आहे. २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीने हे दोन्ही दिग्गज खेळाडू भारताच्या पुढील योजनांचा भाग आहेत की नाही, याबद्दल त्यांना स्पष्ट माहिती दिली पाहिजे, असे युवराजने म्हटले आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्सवर झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान जिओस्टारशी संवाद साधताना युवराजने ही प्रतिक्रिया दिली. रोहित आणि विराटच्या भवितव्याभोवती सध्या असलेल्या अनिश्चिततेमुळे आपल्याला स्वतःच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या अखेरच्या दिवसांची आठवण झाल्याची खंत त्याने व्यक्त केली. कारकिर्दीच्या शेवटी संघात आपली नेमकी भूमिका काय आहे, याबद्दल आपल्यालाही अंधारात ठेवण्यात आले होते, असा खुलासा त्याने केला.
हेही वाचा
महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय; मुंबई, ठाणे आणि पुण्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’
युवराजने पुढे सांगितले की, “दोघांनी खेळावे की नाही, यावर आपण बाहेरून मत देणे योग्य नाही. हा निर्णय संघ व्यवस्थापन, मुख्य प्रशिक्षक आणि निवड समितीचा आहे. जर ते दोघे २०२७ चा विश्वचषक खेळावेत असे वाटत असेल, तर निवड समितीने त्यांच्या खांद्यावर हात ठेवून स्पष्ट सांगावे की, ‘आम्ही प्रत्येक परिस्थितीत तुमच्या पाठीशी आहोत. एखादी मालिका खराब गेली म्हणून स्थान धोक्यात येईल असा दबाव मनात न ठेवता नेहमीसारखे खेळा.'”
इंग्लंड दौऱ्यादरम्यान रोहित शर्माच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या, मात्र बीसीसीआय सचिव देवजित सैकिया यांनी लॉर्ड्सचा सामना रोहितचा शेवटचा सामना असेल या वृत्ताचे खंडन केले होते. यावर भाष्य करताना युवराज म्हणाला की, “एखादा खेळाडू पुढील योजनांमध्ये नसेल, तर ते त्याला समोरासमोर स्पष्ट सांगा. तो निर्णय कठीण असेल आणि बाहेरच्या लोकांना आवडणार नाही, पण इतकी वर्षे देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूला सत्य सांगणे हाच त्याचा खरा सन्मान आहे.”





