रोजच्या जेवणातील मीठ बदला व रक्तदाब, स्ट्रोक- ह्रदयविकाराचा धोका रोखा !, ‘चिमूटभर बदल’ ठरू शकतो जीव वाचवणारा…

मुंबई : भारतात वाढत्या उच्च रक्तदाबाच्या संकटावर मात करण्यासाठी महागड्या उपचारांपेक्षा स्वयंपाकघरातील ‘चिमूटभर बदल’ अधिक परिणामकारक ठरू शकतो असे एम्स आणि सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. रोजच्या जेवणात वापरल्या जाणाऱ्या साध्या मिठाऐवजी कमी-सोडियम आणि पोटॅशियमयुक्त मीठाचा वापर वाढवल्यास हृदयरोग, स्ट्रोक आणि अकाली मृत्यूचा धोका लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो.
देशात उच्च रक्तदाब (हायपरटेन्शन) ही झपाट्याने वाढणारी आरोग्य समस्या बनली असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी साध्या आहारातील बदल महत्त्वाचे ठरत आहेत. दिल्लीच्या एम्स येथील तज्ज्ञांसह सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील अभ्यासकांनी कमी-सोडियम मीठाचा वापर वाढवण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते हा उपाय मोठ्या लोकसंख्येवर सहजपणे आणि कमी खर्चात लागू करता येऊ शकतो.
सध्या भारतात एका व्यक्तीकडून दररोज घेतले जाणारे मीठाचे प्रमाण जागतिक आरोग्य निकषांपेक्षा जास्त आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दररोज ५ ग्रॅम मीठ सेवनाची शिफारस केली असताना भारतात हे प्रमाण ८ ते ११ ग्रॅमपर्यंत जाते. यामुळे रक्तदाब वाढणे, हृदयरोग आणि स्ट्रोकसारख्या आजारांचा धोका अधिक वाढतो.तज्ज्ञांच्या मते, देशातील सुमारे ८० टक्के सोडियमचे सेवन घरगुती स्वयंपाकातूनच होते. त्यामुळे याच पातळीवर बदल केल्यास त्याचा सर्वाधिक सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतो.
हेही वाचा – ‘तेरे नाम २.०…’;’ सलमानचा नवा लूक पाहून आमीर-करिनाला बसला धक्का, व्हिडीओ पाहून तुम्हालाही आठवेल राधे
कमी-सोडियम मीठामध्ये सोडियम क्लोराइडचे प्रमाण कमी करून त्याऐवजी पोटॅशियम क्लोराइड मिसळले जाते. यामुळे शरीरातील सोडियम कमी होते आणि पोटॅशियम वाढते जे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते.एम्स मधील तज्ज्ञांनी या उपायाला ‘डायटरी व्हॅक्सीन’ असे संबोधले आहे. त्यांच्या मते हा असा साधा बदल आहे जो दीर्घकाळासाठी हृदयविकारांपासून संरक्षण देऊ शकतो.संशोधनानुसार पोटॅशियमयुक्त मीठाचा वापर केल्यास स्ट्रोकचा धोका सुमारे १४ टक्क्यांनी तर हृदयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका १२ टक्क्यांनी कमी होऊ शकतो.
भारतामध्ये सध्या कोट्यवधी लोक उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहेत, आणि त्यातील अनेकांना याची जाणीवही नाही. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपायांवर भर देणे अत्यंत गरजेचे ठरत आहे. कमी-सोडियम मीठ हा त्यासाठी प्रभावी आणि सोपा पर्याय म्हणून पुढे येत आहे.तथापि तज्ज्ञांनी काही खबरदारींचाही उल्लेख केला आहे. किडनीचे आजार असलेल्या रुग्णांनी पोटॅशियमयुक्त मीठाचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कारण अशा रुग्णांमध्ये पोटॅशियमचे प्रमाण वाढल्यास इतर गुंतागुंत निर्माण होऊ शकते.
सरकारने या प्रकारच्या मीठाचा प्रसार करण्यासाठी जनजागृती मोहिमा राबवणे, योग्य लेबलिंग करणे आणि किमती परवडणाऱ्या ठेवणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.एकूणच भारताच्या हायपरटेन्शन संकटावर मात करण्यासाठी औषधोपचारांबरोबरच आहारातील साधे बदलही तितकेच महत्त्वाचे ठरू शकतात. रोजच्या जेवणातील ‘मीठ’ बदलल्यास लाखो लोकांचे आरोग्य सुधारण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.





