पंतप्रधान मोदींनी सौदी अरेबियाच्या क्राउन प्रिन्सशी साधला संवाद; होर्मुझ सामुद्रधुनीच्या सुरक्षेवर एकमत

Iran and US-Israel Conflict: इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स व पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. होर्मुझ सामुद्रधुनीमधून होणारी कच्च्या तेल व नैसर्गिक वायूची वाहतूक सुरक्षित ठेवण्याच्या मुद्द्यावर दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाले.
इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात २८ फेब्रुवारी रोजी युद्धाला तोंड फुटले. गेल्या एका महिन्यात हा संघर्ष संपूर्ण मध्यपूर्वेत पसरला असून त्याचे गंभीर परिणाम जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर जाणवू लागले आहेत. होर्मुझ सामुद्रधुनीमधून भारतासह अनेक देशांना होणारा कच्च्या तेलाचा व वायूचा पुरवठा विस्कळीत झाला असून, त्यामुळे अनेक देश ऊर्जा संकटाचा सामना करत आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी या बातचीतीची माहिती आपल्या ‘X’ या सोशल मीडिया अकाउंटवर दिली. त्यांनी लिहिले की, पश्चिम आशियातील चालू संघर्षावर सविस्तर चर्चा झाली. प्रादेशिक ऊर्जा पायाभूत सुविधांवर होत असलेल्या हल्ल्यांचा भारताने निषेध केला असून हे हल्ले क्षेत्राच्या स्थिरतेसाठी धोकादायक असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले. दोन्ही नेत्यांनी शिपिंग मार्ग सुरक्षित व खुले ठेवणे अत्यावश्यक असल्यावर एकमत व्यक्त केले. नौवहन स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी दोन्ही देश एकत्र काम करण्यास सहमत झाले.
हेही वाचा – ‘उद्योग परवानग्यांमध्ये सुलभतेसोबत महाराष्ट्रात वीजदरातही टप्प्याटप्प्याने घट होणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
याशिवाय पंतप्रधान मोदी यांनी सौदी अरेबियात राहणाऱ्या भारतीय समुदायाच्या सुरक्षिततेसाठी व सहाय्यासाठी क्राउन प्रिन्स यांनी दिलेल्या निरंतर पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
या आठवड्याच्या सुरुवातीला, २४ मार्च रोजी पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशीही दूरध्वनीवर पश्चिम आशियाच्या सद्यस्थितीवर चर्चा केली होती.
पंतप्रधान मोदी यांनी १८ मार्च रोजी कुवैतचे युवराज शेख सबाह अल-खालिद अल-हमद अल-मुबारक अल-सबाह यांच्याशी, तर २० मार्च रोजी बहरीनचे किंग हमद बिन ईसा अल खलीफा यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली होती. या दोन्ही संभाषणांमध्येही होर्मुझ सामुद्रधुनीची सुरक्षा, सध्याची परिस्थिती आणि इराण-इस्रायल युद्धावर सविस्तर चर्चा झाली होती.
पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या आणि जागतिक ऊर्जा सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी आखाती देशांशी सातत्याने सुरू ठेवलेला हा राजनैतिक संवाद महत्त्वाचा मानला जात आहे.





