WTC FINAL 2023 : भारतीय संघाची WTC फायनल मध्ये एन्ट्री!

भारताची सलग दुसऱ्यांदा WTC च्या फायनलमध्ये एन्ट्री
IND vs AUS : बॉर्डर-गावस्कर टेस्ट सीरिज भारताने आज २-१ अशा फरकाने जिंकली आहे. आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरू असलेला चौथा आणि अखेरचा कसोटी सामना ड्रॉ झाल्यानंतर यापूर्वीच्या २ सामन्यांच्या विजयामुळे भारताने मालिकेवर वर्चस्व गाजवलं आहे.
कांगारुंनी पहिल्या डावात ४८० आणि भारताने ५७१ धावा केल्या होत्या. तर ऑस्ट्रेलियाने आज आपला दुसरा डाव १७५ धावांवर घोषित केला आणि आज अखेरच्या दिवशी खेळ सुरू असताना सामना अनिर्णित झाला. चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाज विराट कोहलीला (१८६ धावा) सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
याशिवाय शुभमन गिलने १२८ धावा करत आपला फॉर्म या सामन्यातही कायम राखला. याशिवाय अश्विनने देखील आकर्षक गोलंदाजी करत कांगारूंना झटपट तंबूत पाठवले. भारताने नागपूर व दिल्ली येथील २ कसोटी सामने जिंकले असल्याने भारताने मालिका जिंकली आहे. दरम्यान याआधीच्या इंदौर येथील सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या २०२१-२३ साठीची ही टीम इंडियाची शेवटची मालिका होती. या चौथ्या कसोटीत विजय मिळविल्यानंतर या विजयासह टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये अंतिम फेरी गाठली आहे. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघ आधीच अंतिम फेरीत पोहोचला आहे. आता भारत-ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ इंग्लंडमध्ये ७ ते ११ जून दरम्यान अंतिम सामना खेळणार आहेत.




