‘काश्मीर पाकिस्तानचा भाग होईल’; शाहबाज शरीफ यांचे वादग्रस्त वक्तव्य

Shehbaz Sharif | शाहबाज शरीफ यांनी काश्मीरबाबत पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केल्याने भारत-पाकिस्तान संबंधांतील तणाव अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काश्मीर पाकिस्तानचा भाग होईल, असे विधान शाहबाज शरीफ यांनी केले आहे. ते गुरुवारी पाकव्याप्त काश्मीरमधील सभेला संबोधित करताना बोलत होते.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आणि त्यानंतर भारताने राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे दोन्ही देशांतील संबंध आधीच तणावपूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ऑपरेशन सिंदूर अपयशी ठरल्याचा दावा करणाऱ्या शाहबाज शरीफ यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी, प्रवाशांचा संताप
काश्मीरच्या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी काश्मिरी लोकांच्या मताचा आदर करणे आणि संयुक्त राष्ट्रांचा ठराव मान्य करणे आवश्यक असल्याचे मत शाहबाज शरीफ यांनी यावेळी व्यक्त केले. पाकिस्तानची जनता आणि सरकार काश्मिरी लोकांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे सांगत, त्यांना समर्थन दर्शविण्यासाठीच आपण येथे आलो असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सभेदरम्यान वादग्रस्त विधान करताना शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांचा उल्लेख केला. काश्मीर ही पाकिस्तानची ‘रक्तवाहिनी’ असल्याचे सांगत त्यांनी काश्मीरमध्ये शांतता हवी असल्याचे नमूद केले. मात्र, ही शांतता समानता आणि न्याय या तत्त्वांवर आधारित असावी, असेही ते म्हणाले.
शाहबाज शरीफ यांच्या या वक्तव्यामुळे भारत–पाकिस्तान दरम्यानचा राजनैतिक तणाव आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून, या प्रकरणावर भारताकडून प्रतिक्रिया येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.





