मुंबईमध्ये पुढील 2-3 दिवस कोरडे वातावरण तर घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता

ऑगस्ट महिन्यात मुंबईसह महाराष्ट्रामध्ये पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर आता सप्टेंबर महिन्यात पावसाने थोडी उसंत घेतली आहे. दरम्यान हवामान वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबई मध्ये पाऊस नसल्याने पुढील 2-3 दिवस शहरामध्ये सूर्यप्रकाश असणार आहे. दरम्यान हे कोरडे हवामान मुंबईच्या नजीकच्या शहरामध्येही असणार आहे. तर महाराष्ट्राच्या घाट परिसरामध्ये काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. पावसासोबतच तेथे वीजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट असेल.

दरम्यान हवामान खात्याच्या अंदाजानुसार 6 सप्टेंबर पासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हा परिणाम दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागांत दिसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वदूर यंदा चांगला पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी पाणी संकट संपुष्टात आले आहे. मुंबई, पुणे शहरातील तलावक्षेत्रांमध्ये मुबलक पाऊस झाल्याने पाणी कपात रद्द झाली आहे. विदर्भात पावसाचा टिपुसही न पडता मागील काही दिवस त्यांना पूराचा सामना करावा लागत आहे. दरम्यान मध्य प्रदेशात जोरदार पाऊस पडल्याने धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आणि नद्या दुथडी भरूनवाहायला लागल्या. परिणामी चंद्रपूर, गोंदिया मध्ये नदीजवळच्या गावांमध्ये पाणी घुसले आहे.





