मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी, प्रवाशांचा संताप

Pune Mumbai Expressway | मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गवर पुन्हा एकदा भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. आडोशी येथे गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्यानंतर तब्बल ३२ तास महामार्गावर कोंडी होती. गुरुवारी पहाटे टँकर हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली होती. मात्र, शुक्रवारी सकाळपासून पुन्हा एकदा महामार्गावर वाहतूक ठप्प झाल्याने वाहनचालक आणि प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
बोरघाटात कासवगतीने वाहतूक
बोरघाट परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाल्याची माहिती समोर आली आहे. घाटात काही ठिकाणी वाहने बंद पडल्याने वाहतूक कासवगतीने सुरू आहे. ठिकठिकाणी बंद पडलेली वाहने तातडीने हटवली जात नसल्याने कोंडी सुटण्यास विलंब होत असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे.
हेही वाचा : गुरुद्वाराबाहेर थरार! पंजाबमध्ये ‘आप’ नेत्याची गोळ्या झाडून हत्या
अमृतांजन पूल, खालापूर परिसरातही रांगा
अमृतांजन पूल तसेच खालापूर टोल नाका परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहतूक संथ गतीने सुरू आहे. खोपोली परिसरातही वाहनांची गती मंदावली आहे. या संथ वाहतुकीमुळे प्रवासी आणि वाहनधारकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
मंगळवारी सायंकाळी आडोशी बोगद्याजवळ पलटी झालेल्या गॅस टँकरमुळे दोन महानगरांना जोडणाऱ्या या महत्त्वाच्या महामार्गावर ३२ तासांहून अधिक काळ वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेनंतर महामार्गावरील आपत्कालीन व्यवस्थापन, तत्काळ मदत यंत्रणा आणि इतर अत्यावश्यक सुविधांबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सरकार आणि प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, तसेच महामार्गावर अत्यावश्यक सुविधा अधिक सक्षम कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.




