भाजप सरकार पुन्हा आले तर उद्धव ठाकरेंसह देशातील बडे नेते जेलमध्ये जातील
अरविंद केजरीवाल भाजप आणि केंद्र सरकारविरोधात प्रचंड आक्रमक
नवी दिल्लीः दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची 10 मे रोजीे जेलमधून सुटका झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना 1 जूनपर्यंत जामीन मंजूर केला आहे. तुरुंगातून बाहेर येताच अरविंद केजरीवाल भाजप आणि केंद्र सरकारविरोधात प्रचंड आक्रमक झाले आहे. भाजप सरकार पुन्हा आलं तर देशातील प्रमुख विरोधी पक्षातील नेत्यांना तुरुंगात टाकलं जाईल, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
अरविंद केजरीवाल यांनी भाषणातून भाजप आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली. भाजपचं सरकार पुन्हा आलं तर उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, तेजस्वी यादव, स्टॅलिन यांच्यासह देशातील प्रमुख विरोध पक्षाच्या नेत्यांना जेलमध्ये टाकलं जाईल. देशात ‘वन नेशन, वन लीडर’ मिशन सुरु करण्याचा भाजपचा डाव आहे. देशात हुकूमशाही प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असा दावा देखील अरविंद केजरीवाल यांनी केला.
योगी आदित्यनाथ यांनाही मुख्यमंत्रीपदावरुन हटवणार – केजरीवाल
हुकूमशाहीसाठी विरोधी पक्षातीलच नाहीतर भाजपमधील नेत्यांचीही राजकीय कारकीर्द संपवण्यात आली. शिवराज सिंह चौहान, मनोहरलाल खट्टर, वसुंधरा राजे, रमन सिंह यांच्यासही भाजपमधील बड्या नेत्यांना दूर करण्यात आलं. भाजपमधून बड्या नेत्यांनाही संपवण्यात आलं. भविष्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देखील हटवलं जाईल. त्यामुळे देशाला आता हुकूमशाहीपासून वाचवण्याची जबाबदारी आपली आहे, असं म्हणत अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधला.
देशाला वाचवण्यासाठी 140 कोटी जनतेची साथ मला हवी आहे. लोकशाही वाचवण्यासाठी तुमची साथ हवी. मी देशासाठी कोणताही त्याग करायला तयार आहे. मला भाजपला प्रश्न विचारायचा आहे की पुढचा पंतप्रधान कोण होणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर रोजी 75 वर्षांचे होतील, त्यामुळे ते निवृत्त होतील. अमित शाह यांना पंतप्रधान बनवलं जाईल. मोदी अमित शाह यांच्यासाठी मतं मागत आहे, असा देखील दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.





