अविश्वास ठरावामुळे विरोधकांचा पोकळपणा दाखवता आला
- मोदींनी मानले त्याबद्दल कॉंग्रेसचे आभार
नवी दिल्ली – लोकसभेत नुकत्याच झालेल्या अविश्वास ठरावावरील चर्चेच्या निमीत्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की त्यांनी आणलेल्या अविश्वास ठरावामुळे संसदेत मला विरोधकांमधील पोकळपणावर त्यांना उघडे पाडण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या निमीत्ताने आज झालेल्या भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीत बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. विरोंधकांनी आणलेल्या या अविश्वास ठरावामुळे विरोधकांमधील राजकीय परिपक्वतेचा अभाव दिसून आला आणि त्यांच्या या ठरावात काहीच तथ्य नव्ह्ते हे उघड झाले असे ते म्हणाले.
पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाची माहिती संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी दिली. यावेळी भाजपचे अन्य महत्वाचे नेते नितीन गडकरी, सुषमा स्वराज, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचीही भाषणे झाली. या नेत्यांनी पंतप्रधानांचा सत्कारही केला. यावेळी बोलताना अमित शहा म्हणाले की सरकारने बहुमत गमावले असेल तर किंवा देशात अस्वस्थता निर्माण झाली असेल तर सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला जातो पण यावेळी असे काहीही नसताना विरोधकांनी हा ठराव आणून स्वत:चेच हसे करून घेतले आहे.
गडकरी म्हणाले की विविध विषयांच्या बाबतीत लोकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण करण्याचा त्यांचा डाव होता. यावेळी पंतप्रधान म्हणाले की अविश्वास प्रस्ताव बहुमताने फेटाळला गेल्याने भाजपचे व आपल्या मित्र पक्षांचे सर्व खासदारच अभिनंदनाला पात्र आहेत.