यमुनेचे पाणी यंदा अधिक आरोग्यदायी झाले पण पुराच्या पाण्याने
नवी दिल्ली – यंदा यमुनेचे पाणी अधिक आरोग्यदायी झाल्याचे आढळून आले आहे. तथापी त्याचे कारण सरकारचा यमुना शुद्धीकरण प्रकल्प नव्हे तर यावेळी पुराचे मोठे पाणी यमुनेला आल्याने यमुनेचे अशुद्ध पाणी मोठ्या प्रमाणात वाहून गेले आणि तेथे अधिक शुद्ध पाण्याचा साठा निर्माण झाला. पर्यावरण तज्ज्ञांनीच ही माहिती येथे दिली. पुराच्या पाण्यामुळे यमुनेच्या पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाणही वाढले असे तज्ज्ञांनी सांगितले.
या पावसाळ्यात अनेक ठिकाणी यमुनेच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे सखल भागातील सुमारे दहा हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. ही नदी देशातील एक महत्वाची नदी असून ती उत्तराखंड, दिल्ली, हरियाना, आणि उत्तरप्रदेश या राज्यातून वाहात अलाहाबाद येथे गंगा नदीत विलीन होते.
अलिकडच्या काळात गंगेबरोबरच देशातील अत्यंत प्रदुषित नदी म्हणून ती ओळखली जात होती पण नव्याने आलेल्या पाण्यामुळे त्या नदीतील बरेच प्रदुषित घटक वाहून गेले आहेत. तथापी ही स्थिती फार काळ राहण्याची शक्यता नाही कारण पावसाळा संपला की ही नदी पुन्हा प्रदुषित होऊ लागेल असे यमुना जिये अभियानाचे निमंत्रक मनोज मिश्रा यांनी सांगितले.