तीन लाख शिक्षकांची नियुक्ती तीन वर्षात करावी
नवी दिल्ली – सुमारे तीन लाख शिक्षकांची नियुक्ती कॉलेज अणि विद्यापीठांनी येत्या तीन वर्षात करावी असे सरकारने सांगितले आहे. मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राज्यसभेत ही माहिती दिली आहे.
कॉलेज आणि विद्यापीठांमधील शिक्षकांच्या वाढत्या रिक्त जागांमुळे चिंतातूर झालेल्या सरकारने याबाबत त्वरित नियुक्तीसंबधी कार्यवाही केली आहे. कॉलेज आणि विद्यापीठातील शिक्षकांच्च्या ग्रामीण भागात 20.1 टक्के आणि शहरी भागात 29.5 टक्के जागा रिक्त आहेत. एआयएएचई (ऑल इंडिया सर्व्हे ऑन हायर एज्युकेशन) ने केलेल्या सर्व्हेने ही आकडेवारी दिली आहे. ग्रामीण भागात 1,37,298 आणि शहरी भागात 1,68.719 जागा रिक्त असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.
एससी/एसटी आणि ओबीसीसाठी असलेल्या राखीव जागांमध्ये बदल होणार नाही, त्यासाठी आम्ही एक एसएलपी (स्पेशल लीव्ह पिटिशन) दाखल केली आहे, असे एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना जावडेकर यांनी सांगितले. अशा रिक्त जागा न भरण्याबाबत उच्च न्यायालयाने आदेश दिले होते. एससी/एसटी आणि ओबीसी वर्गातील एकाही उमेदवाराला त्याच्या कोट्यातील जागांपासून वंचित केले जाणार नाही, याची आपण खात्री देत असल्याचे जावडेकर यांनी सभागृहाला सांगितले.
नव्या शिक्षण धोरणातील बदलांची खात्री करून घेण्यासाठी इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवीतील 22 लाख विद्यार्थ्यांचा आणि इयत्ता दहावीतील 15 लाख विद्यार्थ्यांचा असेसमेंट सर्व्हे घेण्यात आल्याची माहिती जावडेकर यांनी सभागृहाला दिली. शिक्षण हा एक समवर्ती विषय असून शिक्षकांना शिक्षणाखेरीज अन्य कामांना लावू नये अशा सूचना राज्यांना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.