चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मुक्ता टिळक यांनी दिलं स्पष्टीकरण
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं ब्राह्मण समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यावर भाजप आमदार मुक्ता टिळक यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. चंद्रकांतदादांनी ब्राह्मण समाजाचा उल्लेख केला नसल्याचा दावा मुक्ता टिळक यांनी केला आहे.
‘सिंधुदुर्ग येथे झालेल्या भव्य शेतकरी मेळाव्यात बोलताना काल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील नेमके काय बोलले याचा नीट अभ्यास करावा आणि मग दादांविरुद्ध आंदोलन करावे,’ असा सल्ला भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांनी टीकाकारांना दिला आहे. ‘चंद्रकांतदादांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लीम समाजालाही देशाच्या मुख्य प्रवाहात कसे सामावून घेतले याचा उल्लेख करताना वस्तुस्थिती मांडली. ते म्हणाले की, आत्ताचे मुसलमान हे काही बाबराचे वंशज नाहीत. बाबर आला आणि गेला, तसंच आपल्याकडेही दाते, गाडगीळ अशी आडनावे असलेले मुस्लीम आहेत ते मूळचे इथलेच – कोणीतरी आक्रमक आला आणि ते धर्मांतरित झाले, असा दादांच्या वक्तव्याचा अर्थ आहे,’ असं म्हणत मुक्ता टिळक यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे.