पुणतांबा ग्रामसभेत १६ ठराव मंजूर; आंदोलनाची घोषणा करत सरकारला अल्टिमेटम
अहमदनगर : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आज पुणतांबा येथे विशेष ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे १६ ठराव मंजूर करण्यात आले असून सरकारने या मागण्यांची पूर्तता न केल्यास १ जूनपासून धरणे आंदोलन सुरू केले जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. ग्रामसभेत मंजूर करण्यात आलेल्या ठरावाची प्रत सरकारला पाठवून आंदोलनाचं अल्टिमेटम देण्यात आलं आहे. पुढील सात दिवसांत दखल न घेतल्यास १ ते ५ जून या कालावधीत धरणे आंदोलन केलं जाणार आहे. तसंच ५ जूननंतर आंदोलन आणखी आक्रमक करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी संपाची हाक दिल्यानंतरच २०१७ साली राज्यभरात शेतकऱ्यांचा ऐतिहासिक संप झाला होता. याच पुणतांबा गावातून आता ५ वर्षानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. राहाता तहसीलदारांना उद्या ठरावाचे निवेदन देण्यात येणार आहे. तसंच इतर ग्रामपंचायतींनी हे ठराव सरकारला पाठवावेत, असं आवाहन करण्यात आलं आहे.
- पुणतांबा ग्रामसभेत झालेले ठराव :
– ऊस पिकाला एकरी १ हजार रूपये अनुदान द्यावे
– शिल्लक ऊस पिकाला हेक्टरी दोन लाख रूपये द्यावे
– कांद्यासह सर्व पिकांना हमीभाव द्यावा
– कांद्याला प्रती क्विंटल पाचशे रूपये अनुदान द्यावे
– शेतकऱ्यांना दिवसा पूर्ण दाबाने वीज मिळावी
– थकित वीजबिल माफ झाले पाहिजे
– कांदा आणि गव्हाची निर्यातबंदी उठवावी
– सर्व पिकांना आधारभूत किंमत दिली जावी, त्यासाठी आयोगाची स्थापना करून निर्णय घ्यावा
– २०१७ साली केलेल्या कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी
– नियमित कर्ज भरणारांचे अनुदान दिले जावे
– दुधाला उसाप्रमाणे एआरपी लागू केला जावा
– दुधाला कमीतकमी ४० रूपये दर दिला जावा
– खाजगी दूध संकलन केंद्रात होणारी लूट थांबवावी
– वन्य प्राण्यांमुळे नुकसान झाल्यास भरपाई दिली जावी
– शेतकरी आंदोलनात दाखल गुन्हे मागे घेतले जावे
– वन हक्क कायद्यानुसार आदिवासींना जमिनी नावावर करून द्याव्यात