‘विजयाचा जल्लोष कुणीही करू नये, गुलाल उधळू नये’; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन

पुणे | बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत निर्णायक आघाडी घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली आहे. अजितदादांच्या निधनानंतर होत असलेल्या या निवडणुकीत विजयाचा जल्लोष न करता संयम राखण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभेच्या जागेसाठी ही पोटनिवडणूक पार पडली. आज होत असलेल्या मतमोजणीत तिसऱ्या फेरीअखेर सुनेत्रा पवार यांनी मोठी आघाडी घेतली आहे. या यशावर प्रतिक्रिया देताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, “आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना आपण सर्वांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास मी आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करते.”
हेही वाचा
पाच राज्यांच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स ७०० अंकांनी उसळला
इतकेच नाही तर सुनेत्रा पवार यांनी पोटनिवडणूक विजयाचा जल्लोष साजरा करताना काय काळजी घ्यावी याबद्दल कार्यकरत्यांना आवाहन देखील केले आहे. “आजचा हा निकाल जाहीर होत असताना आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने आपण सर्वजण भावूक आहोत. दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की, या विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये. आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया.”
“दादांच्या स्वप्नातील बारामती घडवण्याची संधी मला दिल्याबद्दल मी सर्व बारामतीकरांचे मनःपूर्वक आभार मानते. हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे. निर्धाराची, संघर्षाची आणि नव्या बारामतीची!” असेही सुनेत्रा पवार म्हणाल्या आहेत.





