अंबरनाथ एमआयडीसीतील केमिकल कंपनीत गॅस गळती
ठाणे – अंबरनाथ शहरातील आयटीआयमागे असलेल्या वडवली केमिकल कंपनीत मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. या गॅस गळतीमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
अंबरनाथ शहरातील नेहरू उद्यानासमोरील काही कंपन्यांनी उग्र वास असलेला गॅस सोडल्याने स्वामीनगर, कानसई, साई सेक्शन, भीमनगर या परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गॅसचे प्रमाण जास्त असल्याने सर्वत्र धुक्यासारखे वातावरण निर्माण झाले होते. समोरचा व्यक्तीदेखील दिसणार नाही तेवढ्या प्रमाणात परिसरात गॅसचा थर निर्माण झाला होता. या गॅसला उग्र वास येत असल्याने नागरिकांना त्याचा त्रासदेखील सहन करावा लागला. या भागातील नागरिकांनी घरातील दारे-खिडक्या बंद करून या गॅसपासून वाचण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावरदेखील मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांनी मदतीसाठी प्रशासनाला बोलाविले. त्यासोबतच अंबरनाथ नगरपालिकेचे अग्निशमन दलदेखील घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने तासाभरातच हा परिसर गॅसमुक्त केला. प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन केमिकल झोनमधील कंपन्यांना केमिकल प्रक्रिया बंद करण्याच्या सूचना दिल्या. एमपीसीबी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे असे प्रकार घडत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.