देशात गेल्या २४ तासांमध्ये ७८ हजार ७६१ नव्या रुग्णांची भर
नवी दिल्ली – जगातील शेकडो देशांना हतबल करणारा कोरोना विषाणू भारतात थैमान घालत आहे. भारतातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच चालला आहे. आज सलग चौथ्या दिवशी देशात ७५ हजारांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात ७८ हजार ७६१ नव्या रुग्णांची भर पडली. ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. या वाढीसह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ३५ लाख ४२ हजार ७३४ वर पोहोचली आहे. यापैकी ७ लाख ६५ हजार ३०२ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
त्याचबरोबर गेल्या २४ तासांत देशात ९४८ जणांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला. यासह देशातील एकूण कोरोनाबळींची संख्या आता ६३ हजार ४९८ इतकी झाली आहे. महाराष्ट्र, दिल्ली आणि गुजरातमध्ये मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. दिलासादायक बाब म्हणजे देशात आतापर्यंत २७ लाख १३ हजार ९३४ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.