जिल्ह्यात ८४६ जणांचे अपहरण
ठाणे | ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत ८४६ जणांचे अपहरण झाल्याचे पोलीस नोंदणीमध्ये आढळून आले आहे. अपहरण झालेल्यांपैकी ८२६ जण अल्पवयीन मुले आणि मुली आहेत. अल्पवयीन मुलींचे प्रमाण हे अपहरण झालेल्यांमध्ये सर्वाधिक आहे. पोलिसांना यातील ८७ टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात यश आले आहे. सर्वाधिक अपहरणाची प्रकरणे हे प्रेमप्रकरणातून घडत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरे येतात. गेल्याकाही वर्षांपासून शहरात अपहरणांच्या गुन्ह्यांची नोंद मोठय़ाप्रमाणात आढळून येत आहे. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत ८४६ जणांच्या अपहरणाची नोंद आढळून आली आहे. ८४६ प्रकरणांतील ७३६ म्हणजेच, ८७ टक्के प्रकरणांची उकल करणे पोलिसांना शक्य झाले आहे. सर्वाधिक अपहरणांच्या नोंदी या अल्पवयीन मुले आणि मुलींच्या आहेत. या कालावधीत ८२६ अल्पवयीन मुला-मुलींचे अपहरण झाले आहे.त्यापैकी ६११ अल्पवयीन मुलींचा तर २१५ अल्पवयीन मुलांचा सामावेश आहे. तर १८ किंवा त्यावर्षांपुढील १७ मुलांचे आणि तीन महिलांचे अपहरण झाले होते. या २० प्रकरणांपैकी सर्वाचा शोध लावण्यात पोलिसांना शक्य झाले आहे. मुलगी अल्पवयीन असल्यास आणि मुलगा अल्पवयीन नसल्यास याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल होत असतो, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. २०२१ च्या तुलनेत २०२० मध्ये अपहरणाचे प्रमाण हे कमी होते. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कालावधीत ५९० जणांचे अपहरण झाले होते. त्यापैकी ५१६ प्रकरणांची उकल करण्यात पोलिसांना यश आले होते.