#Coronolockdown:तेलंगणामध्ये लॉकडाऊन 29 मे पर्यंत वाढवला!
हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी 29 मे पर्यंत वाढवण्याचा आदेश जारी केला आहे. देशभरात सध्या 17 मे पर्यंत लॉकडाऊन आहे. आपल्या राज्यात लॉकडाऊनचा कालावधी वाढवणारं तेलंगणा हे पहिलचं राज्य ठरलं आहे. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव म्हणाले की, “राज्यात सात वाजल्यापासून संचारबंदी लागू केली जाईल. त्यामुळे नागरिकांनी सहा वाजेपर्यंत आवश्यक वस्तू खरेदी करुन घरी जावं.” तेलंगणा सरकारने मंगळवारी घेतलेल्या या निर्णयामुळे आगामी दिवसात केंद्र सरकारही लॉकडाऊनची मर्यादा वाढवू शकतं, अशी चर्चा रंगू लागली आहे.
तेलंगणाच्या केसीआर सरकारने मंगळवारी संध्याकाळी या संदर्भात सविस्तर नियमावली जारी करुन लॉकडाऊनच्या अटींचा उल्लेख केला आहे. सरकारने म्हटलं आहे की, “ज्यांना गरजेच्या वस्तू खरेदी करायच्या असतील त्यांनी त्या खरेदी करुन सहा वाजेपर्यंत घरी परतावं.” “याशिवाय कोणीही लॉकडाऊनचं उल्लंघन केलं तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल,” असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
दरम्यान तेलंगणा देशातील पहिलं असं राज्य होतं जिथे जनता कर्फ्यूनंतरही राज्यात कर्फ्यू कायम ठेवण्याचा आदेश जारी केला होता. याशिवाय संचारबंदीचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी पोलिसांना पूर्णत: सूट दिली होती.