31st साजरा करण्यासाठी पर्यटकांना गोवा हा पर्याय रद्द करावा लागणार ?
पणजी | महाईन्यूज |
कर्नाटकच्या कळसा-भंडुरा प्रकल्पाबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने गोव्याला दिलेल्या आश्वासनाला बगल दिल्यानं पुन्हा एकदा गोव्यात म्हादईप्रश्न पुन्हा पेटला आहे. केंद्र सरकराने गोव्याचा विश्वासघात केला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहे. या गोष्टीचा निषेध करण्यासाठी येत्या ३१ डिसेंबर रोजी म्हादईप्रश्नी गोव्यात तीव्र आंदोलन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी येणाऱ्या पर्यटकांनी काळजी घ्यावी. याशिवाय पर्यटकांना त्रास झाल्यास आम्ही त्याला जबाबदार असणार नाही, असा थेट इशाराच प्रोगेसिव्ह फ्रंट ऑफ गोवाने पत्रकार परिषदेतून दिला आहे.
आज म्हणजेच 25 डिसेंबरला पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत फ्रंटचे ह्रदयनाथ शिरोडकर, महेश म्हांबरे, संतोष कुमार सावंत, प्रजल साखरदांडे, राजन घाटे, रवी हरमलकर व इतर उपस्थित होते.केंद्र सरकारने व गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हादई कर्नाटकला विकली अहे. जावडेकरांचे नवे पत्र म्हणजे हा गोव्याचा विश्वासघात असून मुख्यमंत्र्यांनी गोमंतकीयांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, असा आरोप ह्रदयनाथ शिरोडकर यांनी केला. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला केंद्रात काडीची किंमत नाही, हे या प्रकरणातून सिद्ध होते. केंद्राने गोव्याचा घात केला असून मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे म्हादई वाचवू शकले नाही. नाताळ सणाच्या दिवशी भाजप सरकारने गोमंतकीयांचा विश्वासघात केला आहे. प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसण्याचा नैतिक अधिकार नाही. येत्या ४८ तासांत त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनीसुद्धा पदावरून पायउतार व्हावे, अशी मागणी शिरोडकर यांनी केली. यापुढे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा कुठलाच कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशाराही प्रोगेसिव्ह फ्रंट ऑफ गोवाने दिला.
तसेच कळसा-भंडुरा प्रकल्पाचा पर्यावरणीय परिणाम अभ्यास अहवाल स्थगित ठेवलेला नाही. तसेच लवादाच्या राजपत्रित अधिसूचनेनंतर आणि वन तसेच वन्यप्राणी मंडळाचा परवाना मिळाल्यानंतर कर्नाटक सरकार कळसा-भंडुराच्या कामाला सुरूवात करू शकते, असे कर्नाटकला पाठवलेल्या पत्रात जावडेकरांनी म्हटले आहे. त्यामुळे हा गोव्यासाठी मोठा धक्का असून ही गोमंतकीयांची फसवणूक असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया सध्या विरोधकांकडून व्यक्त केल्या जात आहेत. त्यामुळे 31st सेलिब्रेट करण्यासाठी जे पर्यटक जाण्याचा प्लॅन करतायत त्यांनी जाण्यापूर्वी नक्की विचार करावा…मात्र यामुळे पर्यटकांचा हिरमोड होणार आहेच पण त्याचबरोबर गोव्यातील व्यवसायिकांनाही त्याचा आर्थिक फटका नक्कीच बसणार आहे.