‘महाराष्ट्रात दहशतवाद पसरवणाऱ्या सनातन संस्थेवर बंदी घाला’
मुंबई – ‘सतानत संस्था महाराष्ट्रात दहशतवाद पसरवत असून, या संस्थेचे प्रमुख जयंत आठवले यांनासुद्धा अटक केली पाहिजे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येत त्यांचा सहभाग आहे, असा आरोप करत सनातन संस्थेवर बंदी घालण्यात यावी’, अशी मागणी काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी केली. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलताना हुसेन दलवाई यांनी हा आरोप केला आहे.
भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणाची ताबडतोब चौकशी करा. संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर सरकारने ताबडतोब भूमिका घेणे आवश्यक आहे. पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या दंगलीमध्ये या दोघांचा सहभाग आहे. तसंच, भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणात दोन्ही व्यक्तींचा थेट सहभाग होता. दोघे विशिष्ट विचारांचे असल्यामुळे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारने यांसंदर्भात कडक भूमिका घेणं अत्यंत आवश्यक आहे, असेही हुसेन दलवाई यांनी म्हटले आहे.
संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे ही दोन लोकं महाराष्ट्रात अतिशय वाईट काम करीत आहेत. त्यांना अद्दल घडवली पाहिजे. सरकारने सनातन संस्थेबाबत भूमिका घेत तिच्यावर बंदी घालावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दहशतवाद पसरवणारा कुठल्याही समाजाचा असू दे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. भिडे, एकबोटे महाराष्ट्रात दहशत पसरवण्याचे काम करत आहेत. दाभोलकर, पानसरे यांच्यासारखी माणसं मारली जातात. त्याच्यामागे कोण सूत्रधार आहे तो शोधून काढला पाहिजे, असे हुसेन दलवाई यांनी सांगितले आहे.