भारताच्या किनारपट्टीला मोठा धोका! पुढील ३ महिन्यांत ३ महाचक्रीवादळांचा तडाखा बसणार; ‘इस्रो’चा गंभीर इशारा

नवी दिल्ली | एकीकडे ‘अल निनो’च्या प्रभावामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाची मोठी तूट निर्माण झाली असून शेतकरी चिंतेत असताना, दुसरीकडे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो – ISRO) अत्यंत धोक्याचा इशारा दिला आहे. आगामी मान्सूनोत्तर काळात (ऑक्टोबर ते डिसेंबर २०२६) उत्तर हिंद महासागरात तब्बल ३ तीव्र उष्णकटिबंधीय चक्रीवादळे निर्माण होण्याची शक्यता इस्रोच्या शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. विशेष म्हणजे, गेल्या ४४ वर्षांत आलेल्या चक्रीवादळांपेक्षा या वादळांची तीव्रता आणि तडाखा अधिक विनाशकारी असू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
इस्रोने जवळपास ४० वर्षांहून अधिक काळातील हवामान आणि समुद्राच्या स्थितीचे सखोल विश्लेषण करून हा अंदाज बांधला आहे. वाऱ्याचा वेग आणि वादळाचा कालावधी मोजणाऱ्या ‘पॉवर डिसिपेशन इंडेक्स’नुसार (PDI), २०२६ च्या मान्सूनोत्तर हंगामातील चक्रीवादळांची ऊर्जा आणि तीव्रता गेल्या ४४ वर्षांच्या सरासरीपेक्षा सुमारे ८३ टक्क्यांनी अधिक असण्याची शक्यता आहे. ‘पीडीआय’ जितका जास्त, तितकी वादळाची विध्वंसक क्षमता मोठी मानली जाते.
हेही वाचा
मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा; माणगाव-इंदापूरमध्ये वाहतूक ठप्प
ऑक्टोबर ते डिसेंबरचा काळ किनारपट्टीसाठी अतिसंवेदनशील
जानेवारी ते ऑगस्टदरम्यानच्या सागरी आणि वातावरणीय घटकांच्या आधारे ऑक्टोबर ते डिसेंबर २०२६ या काळातील वादळांच्या हालचालींचा वेध घेण्यात आला आहे. भारतासह उत्तर हिंद महासागराच्या सीमेला लागून असलेल्या देशांचे किनारपट्टीचे भाग या संभाव्य वादळांमुळे कमालीचे संवेदनशील बनले आहेत. त्यामुळे या काळात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांवर इस्रोसह संबंधित यंत्रणांना बारकाईने लक्ष ठेवावे लागणार असून आपत्ती व्यवस्थापनासाठी पूर्वतयारी करणे गरजेचे बनले आहे.





