Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहनांना आजपासून बंदी!

Mumbai-Goa Highway | आगामी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांचा प्रवास सुरक्षित आणि वाहतूक कोंडीमुक्त व्हावा, यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर १६ टन किंवा त्यापेक्षा अधिक वजन क्षमता असलेल्या सर्व अवजड वाहनांच्या वाहतुकीवर आज (११ सप्टेंबर) मध्यरात्रीपासून टप्प्याटप्प्याने बंदी लागू करण्यात आली आहे. संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी परिवहन विभागाने यासंदर्भात अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.
गणपती आगमन काळात ११ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून १५ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपर्यंत अवजड वाहनांना महामार्गावर पूर्ण बंदी असेल, तर पाच दिवसांच्या गणपती विसर्जनासाठी १८ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते रात्री ११ वाजेपर्यंत ही बंदी लागू राहील; यानंतर गौरी-गणपती विसर्जनानिमित्त १९ आणि २० सप्टेंबर रोजी दोन्ही दिवस रात्री ११ वाजेपर्यंत अवजड वाहनांना महामार्गावर प्रवेश दिला जाणार नसून, अनंत चतुर्दशी व परतीच्या प्रवासादरम्यान २५ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपासून ते २६ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद राहील.
हेही वाचा
भंडारा जिल्ह्यात ट्रक-पिकअपचा भीषण अपघात; ८ मजुरांचा जागीच मृत्यू, ४ गंभीर
अत्यावश्यक सेवांना बंदीतून मुभा
नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून दूध, पेट्रोल, डिझेल, घरगुती एलपीजी सिलिंडर, भाजीपाला, औषधे, लिक्विड ऑक्सिजन, अन्नधान्य आणि नाशवंत वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना या निर्बंधातून वगळण्यात आले आहे. तसेच रुग्णवाहिका, अग्निशामक दल, पोलीस वाहने, जेएनपीटी व जयगड बंदरातील आयात-निर्यात करणारी वाहने आणि महामार्ग रुंदीकरणाचे साहित्य वाहून नेणाऱ्या वाहनांना (वाहतूक पोलिसांच्या परवान्यासह) वाहतुकीची मुभा असेल.





