नूतन अभियांत्रिकी मध्ये स्मार्ट इंडिया हॅकाथॉन २०२६ चे संस्थास्तरीय आयोजन

पिंपरी : नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे स्मार्ट इंडिया हॅकाथॉन (एसआयएच) २०२६ चे संस्थास्तरीय आयोजन नुकतेच करण्यात आले. या उपक्रमात २०० हून अधिक संघांमधील १२०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध नाविन्यपूर्ण कल्पना आणि तंत्रज्ञानाधारित उपाय सादर केले.
या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणुन शास्त्रज्ञ तथा सी_डीएसी चे संयुक्त संचालक, महेश भार्गव, लॉरेल्स टेक्नॉलॉजी चे संचालक विराग सरनाईक, उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना सर्जनशील विचार करण्याची, समकालीन समस्यांवर व्यावहारिक उपाय विकसित करण्याची तसेच उद्योजकीय दृष्टिकोन अंगीकारण्याची प्रेरणा मिळाली.

कार्यक्रमाच्या स्वागतपर भाषणात एनएमआयईटी संचालक डॉ.प्रमोद पाटील यांनी नवोपक्रम, संघभावना आणि सहकार्याच्या माध्यमातून समस्या सोडविण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी एसआयएच २०२६ चे तीन प्रमुख स्तंभ — “इनोवट , अँड क्रिएट इम्पॅक्ट ” अर्थात “नवोपक्रम करा, सहकार्य करा आणि प्रभाव निर्माण करा” असे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी पारंपरिक विचारांच्या पलीकडे जाऊन समाज आणि उद्योगांसमोरील वास्तविक समस्यांवर परिणामकारक उपाय विकसित करण्याचे आवाहन त्यांनी केले.
हेही वाचा – सफरचंदापेक्षा स्वस्त पेरूही आरोग्यासाठी फायदेशीर; जाणून घ्या ७ महत्त्वाचे फायदे

डॉ. अश्विनी शिंदे, एसपीओसी , एस आय एच २०२६ यांनी स्मार्ट इंडिया हॅकाथॉनची उद्दिष्टे, सहभाग प्रक्रिया, मूल्यमापन पद्धती आणि या उपक्रमाचे महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
संस्थास्तरीय हॅकाथॉनचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे १५ उद्योगतज्ज्ञांचा ज्युरी सदस्य म्हणून सहभाग. हे उद्योगतज्ज्ञ सहभागी संघांनी सादर केलेल्या नाविन्यपूर्ण कल्पना आणि उपायांचे मूल्यमापन करीत आहेत. त्यांच्या सहभागामुळे विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, व्यावसायिक अभिप्राय आणि वास्तविक औद्योगिक समस्यांची जाणीव होत असून, उद्योग–शैक्षणिक संस्था संबंध अधिक दृढ होण्यास मदत होत आहे
संस्थेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे, उपाध्यक्ष नंदकुमार शेलार अभियांत्रिकीच्या कार्यकारी समितीचे चेअरमन राजेश म्हस्के, सचिव संतोष खांडगे आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी या उपक्रमाचे कौतुक विद्यार्थ्यांनी नवोपक्रम, उद्योजकता आणि तंत्रज्ञानाधारित उपायांच्या माध्यमातून समाज व उद्योगांच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. मदगोंडा बिरादार यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.





