पुण्यात राहुल गांधींची काँग्रेस नेत्यांसोबत बैठक; ‘धमकावलं तरी लढत राहा’, कार्यकर्त्यांना कानमंत्र
‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमासाठी पुण्यात आगमन; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चा, भाजपकडून कार्यक्रमावर टीका

पुणे : काँग्रेस नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते Rahul Gandhi आज पुणे दौऱ्यावर आहेत. ‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते महाराष्ट्रातील तरुणाई, विशेषतः झेन-जी पिढीशी संवाद साधणार आहेत. त्यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठकही पार पडली.
राहुल गांधींचे पुण्यात आगमन झाल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह पक्षातील प्रमुख नेत्यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. त्यानंतर राहुल गांधी यांनी राज्यातील प्रमुख काँग्रेस नेत्यांसोबत बैठक घेत महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचा आढावा घेतला.
पुण्यातील विद्यार्थ्यांच्या घटनेची माहिती घेतली
बैठकीच्या सुरुवातीलाच राहुल गांधी यांनी पुण्यात गुरुवारी विद्यार्थ्यांशी संबंधित घडलेल्या घटनेची संपूर्ण माहिती घेतली. काँग्रेस नेत्यांनी त्यांना या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. यावेळी राहुल गांधी यांनी काँग्रेस नेत्यांना कोणत्याही दबावाला न घाबरता संघर्ष सुरू ठेवण्याचा संदेश दिल्याचे सांगण्यात आले.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बैठकीतील चर्चेबाबत माहिती देताना सांगितले की, राहुल गांधी यांच्यासोबत सामाजिक आणि राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा झाली. भाजपकडून धमकावण्याचा किंवा घाबरवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो; मात्र, अशा परिस्थितीतही लढत राहा, असा संदेश राहुल गांधी यांनी दिल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.
हेही वाचा – खवड्या डोंगरावरील हृदयद्रावक घटना; तरुणाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू
‘राहुल गांधी विचार देतात’
विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी भाजपवरही टीका केली. “भाजप हे लोकांच्या मनातून गेलेले सरकार आहे. तांत्रिक सरकार उरले आहे,” असा दावा त्यांनी केला. राहुल गांधी ‘कानमंत्र’ देत नाहीत, तर विचार देतात आणि आज त्यांनी आम्हाला विचार दिले, असेही वडेट्टीवार म्हणाले.
‘काँग्रेसमधील मरगळ दूर झाली’
राहुल गांधींच्या स्वागतासाठी पुण्यात काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला जात असल्याचे अपक्ष खासदार आणि काँग्रेस समर्थक विशाल पाटील यांनी सांगितले.
“आम्ही एवढे दिवस प्रयत्न करत होतो. आता या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आनंद आहे. काँग्रेसमध्ये जी मरगळ आली होती, ती आता दूर झालेली पाहायला मिळत आहे,” असे विशाल पाटील यांनी म्हटले.
‘छात्रों की गुंज’वरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने
दरम्यान, राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्यातील ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काँग्रेसकडून कार्यक्रमाचे जोरदार प्रमोशन करण्यात येत असताना भाजप नेत्यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. विद्यार्थ्यांचा राजकीय फायद्यासाठी वापर केला जात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.





