राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यावरून भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल
‘छात्रों की गूंज’ नाही, हा तर ‘पैसों की गूंज’ कार्यक्रम; नवनाथ बन यांचा गंभीर आरोप

पुणे : काँग्रेस नेते राहुल गांधी आज पुणे दौऱ्यावर असून ते ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून जोरदार वातावरणनिर्मिती सुरू असतानाच, भाजपने राहुल गांधी आणि काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला ‘छात्रों की गूंज’ नसून ‘पैसों की गूंज’ असल्याचा आरोप केला.
मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बन यांनी काँग्रेसवर पैसे देऊन कार्यक्रमासाठी गर्दी जमवल्याचा आरोप केला. राहुल गांधींच्या कार्यक्रमाला नागरिक उत्स्फूर्तपणे येत नसल्यामुळे काँग्रेसकडून पैसे देऊन गर्दी जमवली जात असल्याचा दावा त्यांनी केला.
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या माध्यमातून काँग्रेसचे नवे ‘पीपीपी मॉडेल’ अर्थात ‘पेड पॉलिटिकल प्रोग्राम’ समोर आले असल्याचा आरोप नवनाथ बन यांनी केला. यावेळी त्यांनी काही व्हिडीओही पत्रकार परिषदेत दाखवले.
हेही वाचा – २६/११ हल्ल्यातील सहा फरारी पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात अनुपस्थितीत खटला चालवण्याची मागणी
राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी समाजमाध्यमांवरील प्रभावशाली व्यक्तींना प्रत्येकी ३० ते ३५ हजार रुपये देण्याची ऑफर देण्यात आल्याचा दावा बन यांनी केला. या संपूर्ण प्रकरणामागे नेमका कोणाचा हात आहे, याची शासनाने चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
सुमारे तीन हजार लोकांना प्रत्येकी ३० ते ३५ हजार रुपये देऊन कार्यक्रमाला आणले जात असेल, तर त्यासाठी सुमारे ९ ते १० कोटी रुपयांचा खर्च होऊ शकतो, असा दावा नवनाथ बन यांनी केला.
राहुल गांधींना पुन्हा राजकीयदृष्ट्या प्रस्थापित करण्यासाठी केवळ गर्दी जमवण्यावरच जवळपास दहा कोटी रुपयांचा खेळ सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी रात्री एनएसयूआय आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकीय वातावरण तापले आहे.





