महत्त्वाची बातमी: ‘मन की बात’ उपक्रमात भोसरी विधानसभा महाराष्ट्रात अव्वल!
भाजपा आमदार महेश लांडगे अन् टीमचे प्रभावी नियोजन : सलग दुसऱ्या महिन्यात ४८३ पैकी ४८३ बूथवर १०० टक्के आयोजन

राज्यातील टॉप-५ विधानसभा मतदारसंघांमध्ये भोसरी अव्वल
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय ‘मन की बात’ या संवाद कार्यक्रमाच्या १३६ व्या भागाचे भोसरी विधानसभा मतदारसंघात अभूतपूर्व आणि शंभर टक्के यशस्वी आयोजन करण्यात आले. भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या नियोजनातून मतदारसंघातील सर्व ४८३ बूथवर हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विशेष म्हणजे, सलग दुसऱ्या महिन्यात १०० टक्के बूथवर ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यश आले असून, या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्रातील ‘मन की बात’ उपक्रमात भोसरीने अव्वल स्थान पटकावत राज्यातील टॉप-५ विधानसभा मतदारसंघांमध्ये आपली दमदार नोंद केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि भाजपा पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या नेतृत्त्वात पिंपरी-चिंचवड शहरात या उपक्रमाचे प्रभावी नियोजन करण्यात आले होते. भोसरी मतदार संघातील प्रत्येक बूथवर नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभल्याने कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
‘मन की बात’ हा केवळ एक कार्यक्रम नसून, देशाच्या विकासाचा दृष्टिकोन, समाजपरिवर्तनाचे विचार आणि नागरिकांशी थेट संवाद साधणारे प्रभावी माध्यम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम भोसरी विधानसभा मतदारसंघात संघटनात्मक पातळीवर अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात येत असल्याचे या उपक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
हेही वाचा : To The Point: ‘माय वे ऑर द हायवे’; राष्ट्रवादीत पार्थ पवारांचे ‘सुपर पॉवर सेंटर’!
यापूर्वी जून महिन्यात झालेल्या ‘मन की बात’ कार्यक्रमातही भोसरीतील सर्व ४८३ बूथवर १०० टक्के आयोजनाची ऐतिहासिक नोंद केली होती. त्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भोसरीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे विशेष अभिनंदन केले होते. जुलै महिन्यातही ही परंपरा कायम राखत भोसरीने पुन्हा एकदा राज्यात आपली संघटनात्मक ताकद सिद्ध केली आहे.
विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक बूथवर झालेल्या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, मंडल अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच आजी-माजी नगरसेवकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. त्यामुळे ‘मन की बात’ उपक्रम राज्यात आदर्शवत ठरला असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
“देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मार्गदर्शक विचार आगामी काळातही प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. याकामी प्रत्येक बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, मंडल अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी-माजी नगरसेवक आणि ‘मन की बात’ उपक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक नागरिकाच्या समर्पित योगदानाचे फलित आहे. सर्वांच्या सकारात्मक एकजुटीमुळे आणि संघटनशक्तीमुळे हा उपक्रम यशस्वी होत आहे. आगामी काळात आणखी प्रभावी आणि व्यापक स्वरूपात या कार्यक्रमाचे नियोजन करण्याचा आमचा मानस आहे.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
काय आहे मन की बात..?
‘मन की बात’ हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागरिकांशी थेट संवाद साधणारा लोकप्रिय मासिक रेडिओ कार्यक्रम आहे. ३ ऑक्टोबर २०१४ रोजी या कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमातून पंतप्रधान विविध सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण, विज्ञान-तंत्रज्ञान, नवोपक्रम, महिला सक्षमीकरण, युवा प्रेरणा, स्वच्छता, जलसंवर्धन आणि राष्ट्रहिताच्या विषयांवर देशवासीयांशी संवाद साधतात. विशेष म्हणजे, या कार्यक्रमात देशाच्या कानाकोपऱ्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामान्य नागरिकांच्या प्रेरणादायी कार्याची दखल घेत त्यांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली जाते.
‘मन की बात’ हा केवळ सरकारी योजनांची माहिती देणारा कार्यक्रम नसून, ‘जनसहभागातून राष्ट्रनिर्माण’ या संकल्पनेला बळ देणारे एक प्रभावी व्यासपीठ म्हणून ओळखला जातो. आकाशवाणी, दूरदर्शन, विविध डिजिटल माध्यमे तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हा कार्यक्रम देशभरात आणि जगातील अनेक देशांमध्ये प्रसारित केला जातो. नागरिकांशी भावनिक आणि सकारात्मक संवाद साधणारा हा उपक्रम आज जगातील सर्वाधिक लोकप्रिय सार्वजनिक संवाद कार्यक्रमांपैकी एक मानला जातो.





