To The Point : खासदार अमोल कोल्हे यांची भीमा कोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमाकडे पाठ!
पुण्यात असतानाही खासदारांना वेळ मिळाला नाही?

आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर
पुणे | विशेष प्रतिनिधी
फुले-शाहु-आंबेडकर आणि पुरोगामी विचारांच्या गप्पा मारणारे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना भीमा कोरेगाव येथील शौर्य दिनाचा चक्क विसर पडला की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, खासदार शौर्य दिनाच्या दिवशी दिवसभर पुण्यामध्येच होते. त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये काही खाजगी कार्यक्रमांना उपस्थिती लावली. मात्र, महाराष्ट्राचे प्रेरणास्थान असलेल्या भीमा कोरेगावच्या शूरवीरांच्या नतमस्तक होण्यासाठी खासदारांना वेळ मिळाला नसल्यामुळे आंबेडकरी चळवळीतील कार्यकत्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त विजयस्थंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यातून तसेच देशभरातून मोठ्या प्रमाणात भीम अनुयायी मोठ्या प्रमाणात दाखल होतात. दि. १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे मोठ्या संख्येने विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. या ठिकाणी जवळपास ७ ते ८ लाख नागरिक या ठिकाणी उपस्थित होते. मात्र, स्थानिक खासदार असलेले डॉ. कोल्हे केवळ सोशल मीडियावर व्यक्त झालेले पहायला मिळाले.
भीमा कोरेगाव डॉ. अमोल कोल्हे प्रतिनिधित्व करीत असलेल्या शिरूर मतदारसंघांमध्ये येते. त्यामुळे कोल्हे यांनी या ठिकाणी येऊन विजय स्तंभाला प्रत्यक्ष अभिवादन करणे अभिप्रेत असताना पुण्यामध्ये असून देखील कोल्हे यांनी या कार्यक्रमासाठी येणे टाळले. आंबेडकरी अनुयायांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.
हेही वाचा – सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत?
दुसरीकडे, जेजुरीला महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडोबाचा चंपाषष्टी उत्सव झाला. त्यापूर्वी, श्रीक्षेत्र आळंदी येथे ज्ञानेश्वर माउलींचा संजीवन समाधी सोहळा झाला. त्यावेळीही डॉ. कोल्हे फिरकले नाहीत.
छत्रपती संभाजी महाराज मालिकेतून पदार्पण केल्यानंतर डॉ. अमोल कोल्हे घराघरात पोहोचले. प्रत्येक ठिकाणी पुरोगामी विचारांचा डंका पिटणाऱ्या डॉ. कोल्हे दुतोंडी वागतात याचा अनुभव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी घेतला. धर्माभिमानी छत्रपती संभाजी महाराज यांचा अभिनय करणे आणि प्रत्यक्षात त्यांचे विचार कृतीत असणे… ही बाब वेगळी आहे. डॉ. कोल्हे अभिनेते झाले, मात्र देव-देश-धर्माचरणाबाबत उदासीन आहेत, अशी टीका होवू लागली आहे.
‘संविधान वाचवा’चा नारा..पण, महापरिनिर्वाण दिनाचाही विसर..?
दरम्यान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई-दादर येथील चैत्यभूमीवर भीमसागर लोटला. चंपाषष्टीला मतदार संघातील एकाही खंडोबा देवस्थानला भेट न देणारे खासदार अमोल कोल्हे मुंबई किंवा दिल्लीत असतील, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर नतमस्तक होतील, असा वाटले होते. मात्र, तसे झाले नाही. पुरोगामी आणि फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र… असा दावा केवळ निवडणुकपुरता होता का? असा प्रश्नही नेटिझन्स विचारत आहेत. लोकसभा निवडणुकीत राजकारणासाठी ‘संविधान वाचवा’ चा नारा देणारे खासदार डॉ. अमोल कोल्हे याबाबत आत्मचिंतन करणार आहेत का? असा प्रश्न आहे.





