16 जुलैपासून मुंबईत दुधाचा एक थेंबही येऊ देणार नाही, खासदार राजू शेट्टींचा इशारा
मुंबई – गायीच्या दुधाला ५ रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालं नाही तर १६ जुलैपासून मुंबईचा दूध पुरवठा तोडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला दिलाय. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
पुण्यात साखर आणि दूध प्रश्नी 29 जून रोजी मोर्चा काढून सरकारला इशारा दिला होता. मात्र सरकारने याकडे कानाडोळा केलाय. त्यामुळे दूधसंकलन आणि दूध विक्री बंद आंदोलनामुळे जी परिस्थिती उद्भवेल त्यास सरकार जबाबदार असेल, पण यापुढे शेतकऱ्याची लूट होऊ देणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी दिलाय. दूध भुकटी, पावडर आणि लोणी जीएसटीमधून वगळावी, अशी मागणीही त्यांनी केली.
सध्या दूध उत्पादक ढासळलेल्या दरामुळे आर्थिक संकटात सापडलाय. दुधाचा उत्पादन खर्च 35 रुपये लिटरवर जाऊन पोहोचलाय. मात्र सध्या शेतकऱ्यांना 15 रुपये दर मिळतोय. याबाबत दुधसंघाच्या प्रतिनिधीसह प्रत्यक्ष भेटून सरकारला याबाबतची समस्या मांडली होती.यावर सरकारने दुधाच्या भुकटी साठी 3 रुपये देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी 53 कोटी रुपये खर्च ही करण्यात आला आहे. मात्र या 53 कोटी रुपयां पैकी एक रुपयाही दूध उत्पादन करणार्यांना मिळाला नाही. सरकारने या प्रश्नाकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज असतांना जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळेच दूध विक्री करायची नाही असा निर्णय घेण्यात आला असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.