संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे पुण्यात आगमन
पुणे – डोईवर तुळशीवृंदावन, हाती टाळ त्यास मृदुंगाची साथ, मुखी अखंड हरीनामाचा जयघोष करीत सावळ्या विठ्ठलाच्या भेटीला निघालेल्या वैष्णवांच्या संगे, संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे शनिवारी सायंकाळी 6 वाजता पुण्यात आगमन झाले. यंदा वारीनिमित्ताने श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आणि आळंदी तर्फे माऊलींच्या पालखी मार्गांवर स्वच्छ वारी-सुंदर वारीचा संदेश देण्यात आला.
संत ज्ञानेश्वरांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात व संत तुकाराम महाराजांची पालखी नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिरात मुक्कामास असून, पुढील मार्गाकडे प्रस्थान असणार आहे. चांदीच्या रथात विराजमान झालेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे स्वागत मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात करण्यात आले. दहिभाताचा नैवेद्य दाखविल्यानंतर दोन्ही पालख्यांचे मंदिरांच्या सभामंडपात स्थानापन्न झाल्या. समाज आरती होऊन, पालख्यांच्या दर्शनाकरीता दर्शनबाऱ्या खुल्या करण्यात आल्या.
तत्पूर्वी वाकडेवाडी जवळील पाटील इस्टेट येथे महानगरपालिकेच्या वतीने पालख्यांचे स्वागत करण्यात आले. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, संघटना, सार्वजनिक गणेश मंडळांतर्फे तसेच सर्वधर्मिय नागरिकांच्या वतीने वारकऱ्यांना पिण्याच्या पाणी आणि खाद्यपदार्थांच्या पाकिटांचे वापट करण्यात येत होते. पालखी दर्शनाकरिता रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. माऊली व तुकोबांच्या पालखी समोरून डौलाने चालणाऱ्या अश्वांचेही दर्शन नागरिक मोठ्या भक्तीभावाने घेत होते.
महापौरांच्या हस्ते पालखीस पुष्पहार
महापौर मुक्ता टिळक यांनी पालखीस पुष्पहार अर्पण केला. यावेळी पालखी रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली. याप्रसंगी आमदार विजय काळे, नगरसेवक अदित्य माळवदे, नगरसेविका स्वाती लोखंडे, मंजुश्री खर्डेकर, शिल्पा भोसले उपस्थित होते. पालिकेच्या वतीने पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या दिंडीप्रमुखांचा आणि विणेकर्यांना श्रीफळ व बिया आणि महिलांना तुळस देऊन सन्मान करण्यात आला.