२० एप्रिलपासून टोल वसुली सुरु
नवी दिल्ली | सरकारने लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवलं असलं तरी टोल वसुली मात्र २० एप्रिलपासूनच सुरू करणार असल्याचं सांगितलं आहे. एनएचएआय म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रस्त्यांवर टोल वसुली सुरू केली जाणार असल्याचं पत्र सरकारने जारी केलं आहे. वाहतूक उद्योगीशी संबंधित वर्गाने या निर्णयाचा विरोध केला आहे.
राष्ट्रीय लॉकडाऊननंतर २५ मार्चपासून टोल वसुली अनिश्चित काळासाठी बंद केली होती, जेणेकरुन जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा. पण ही वसुली आता पुन्हा सुरू होणार आहे.
रस्ते परिवहन मंत्रालयाने एनएचएआयला पत्र लिहिलं आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व ट्रका आण मालवाहू वाहनांच्या आंतरराज्यीय हालचालीसाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे एनएचएआयने गृह मंत्रालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावी आणि टोल वसुली २० एप्रिल २०२० पासून सुरू करावी, असं या पत्रात म्हटलं आहे. केंद्रीय परिवहन मंत्रालयाने एनएचएआयच्या एका पत्राचं उत्तर दिलं आहे. एनएचएआयने ११ ते १४ एप्रिल या काळात पत्रव्यवहार केला होता. गृह मंत्रालयाने खाजगी आणि संस्थांच्या अनेक कार्यांसाठी २० एप्रिलपासून परवानगी दिली आहे. टोल वसुली सुरू केल्यामुळे सरकारला यातून महसूल मिळेल आणि एनएचएआयलाही आर्थिक लाभ होईल, असं कारण टोल सुरू करण्यामागे देण्यात आलं आहे.