हिंजवडीत विजेचा धक्का लागून तिघांचा मृत्यू, जखमीला उपचारास औंध रुग्णालयात दाखल
पिंपरी|महाईन्यूज|
हिंजवडीतील स्वर्गीय राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान नगरीतील तिसऱ्या टप्यात पथदिवे दिवे लावत असताना तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घटना घडली.
हिंजवडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजय जोगदंड यांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर आयप्पा माशाळकर (वय २०), सागर कुपु पारंडेकर (वय १९) राजू कुपु पारंडेकर (वय ३५, तिघेही रा. बिजलीनगर, चिंचवड) अशी मृतांची नावे आहेत, तर सुधाकर तलवार हा कामगार गंभीर जखमी झाला आहे.
हिंजवडीतील स्वर्गीय राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान नगरीतील टप्पा तीन येथील गणेशनगर ते भोईरवाडी दरम्यान पथदिवे उभारण्याचे काम सुरू होते. महावितरणने हे काम एका ठेकेदाराला दिले होते. त्याच ठेकेदाराकडे हे चौघे कामाला होते. भोईर वाडीतील जय गणेश कॉलनीच्या स्मशानभूमीजवळ जाणाऱ्या रस्त्यावर पथदिव्यावर दिवे बसविण्याचे काम हे कामगार करत होते. हे काम करत असताना वर वीजप्रवाह सुरू असलेल्या तारा कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्या नाहीत. त्यामुळे रोलरशिडी ढकलत असताना त्या लोखंडी शिडीचा स्पर्श तारांना होवून त्यामध्ये वीज पुरवठा उतरल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर सुधाकर तलवार जखमी झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अजय जोगदंड, पोलिस उप-निरीक्षक कविता रुपनर, पोलिस हवालदार दीपक परकाळे, शंकर उतेकर, विनोद मोहिते यांनी घटनास्थळी तत्काळ पंचनामा करून जखमीला उपचारासाठी औंध येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्परता दाखवत वीज पुरवठा खंडित करून चिकटलेले मृतदेह बाजूला केले. उत्तरीय तपासणीसाठी रूग्णालयात दाखल केले आहेत.