तब्बल 18 लाखांचे दागिने बंगालच्या कारागीराने पळविले
पुणे- सराफाकडून दागिने बनविण्यासाठी 18 लाखांचे सोने घेऊन गेलेला कारागीर पसार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कांतीलाल पृथ्वीराज ओसवाल (65, रा. शुक्रवार पेठ) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, कारागिर सुनील बाग (रा. सध्या. बुधवार पेठ, मूळ. बंगाल) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश पेठेतील शिवराम दादा तालीम येथे ओसवाल सराफी दुकान आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार दागिने बनवून देतात. बाग हा गेल्या बारा वर्षापासून त्यांच्याकडे दागिने बनवित होता. दि. 12 मे आणि 19 मे रोजी त्याने दागिने बनविण्यासाठी ओसवाल यांच्याकडून 18 लाख 500 रुपयांचे सोने नेले होते. तो दागिने बनवून देणार होता. परंतु, तो आलाच नाही. त्यांनी फोन लावले.
मात्र, त्याचा फोन बंद येत होता. तो राहत असणाऱ्या ठिकाणी चौकशी केली. त्यावेळी तीन ते चार दिवसांपासून तो आला नसल्याचे समजले. त्याच्या ओळखीतल्या लोकांची माहिती घेतली असता तेही पसार झाल्याचे समजले. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने ओसवाल यांनी पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी अधिक तपास वाय. पी.सूर्यवंशी करत आहेत.