सीमेवर चीनचा जोरदार युद्धसराव! भारताकडेही मास्टरप्लान तयार
भारत-चीनमधील वादग्रस्त नियंत्रण रेषेवर तिबेटच्या स्वायत्त प्रदेशात चिनी हवाई दलाकडून जोरदार युद्ध सराव सुरु आहे तसेच या भागात उभारलेल्या इन्फ्रास्ट्रक्चरमुळे चीनची हवाई ताकतही वाढली आहे. पूर्व सेक्टरमधील चीनची ही आक्रमकता लक्षात घेऊन त्यांना रोखण्यासाठी भारतीय हवाई दलानेही योजना बनवली आहे. या रणनितीतंर्गत भारतीय हवाई दलाकडून चीनूक आणि अपाची हेलिकॉप्टर्सचे स्कवाड्रन तैनात करण्याचीही योजना आहे.
रशियाच्या एस-४०० क्षेपणास्त्र प्रणालीशिवाय राफेल फायटर विमानांचे एक स्कवाड्रनही येथे सज्ज ठेवण्यात येईल. एकूणच चीनला जशास तसे उत्तर देण्याची भारतीय हवाई दलाने तयारी केली आहे. चीनूक आणि अपाची हेलिकॉप्टर्सचा २०२० पर्यंत भारतीय सैन्य दलांमध्ये समावेश होणार असून एस-४०० आणि राफेल फायटर विमाने २०२१ पर्यंत ताफ्यात दाखल होतील.
सीमेपलीकडे चीनची वाढलेली सक्रीयता लक्षात घेऊन या भागात सुखोईचे एसयू-३० एमकेआयचे आणखी एका स्कवाड्रन तैनात करण्यावरही विचार सुरु आहे. डोकलाम संघर्षानंतर चीनने तिबेटमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या उभारणीवर विशेष लक्ष दिले आहे. ऑगस्ट २०१४ पासून आकाश क्षेपणास्त्राची सहा युनिट इथे सज्ज ठेवण्यात आली आहेत असे हवाई दलाच्या एका अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले.