संचार बंदीचे उल्लंघन, मुंबईत २८९ जणांना अटक
संचारबंदी लागू झाल्यापासून मुंबई पोलिसांनी शहरात कडक कारवाई सुरू केली आहे. २० ते २६ मार्चपर्यंत संपूर्ण शहरात अटक केलेल्यांची संख्या २८९वर पोहोचली आहे. २२ आरोपी अद्याप हाती न लागल्याने पोलिसांचा तपास सुरू आहे. तर आतापर्यंत जामीन मिळालेल्यांची संख्या १७६ आहे. या धावपळीत एका करोना संशयितास ताब्यात घेऊन तातडीने रुग्णालयात रवाना करण्याचे कामही पोलिसांनी केले आहे.
मुंबईत संचारबंदी कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कोणतीही कार्यालये, दुकाने आदी चालविण्यास मनाई आहे. तसेच समूहाने एकत्र येण्यासही मज्जाव आहे. लोकांनी एकत्रित बाहेर पडून संसर्गाची भीती वाढू नये म्हणूनच राज्य सरकारने संचारबंदी लागू केली. हे नियम मोडणाऱ्यांविरोधात भारतीय दंड संहिता १८८ अंतर्गत कारवाई केली जाते. त्यानुसार पोलिसांकडून शहरात चोख बंदोबस्त ठेवून कायदे मोडणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. २० मार्चपासून सुरू झालेल्या अमलानुसार आतापर्यंत अटक केलेल्यांची संख्या २८९वर पोहोचली आहे. त्यात अवैध वाहतूक, हॉटेले, पानपट्ट्या, अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने, फेरीवाले आदींचा समावेश आहे.
‘घराबाहेर पडू नका,’ असे आवाहन पोलिसांकडून सातत्याने केले जात आहे. त्यासाठी मोबाइल व्हॅनच्या सहाय्याने संदेश देण्यासह सोशल मीडियाचीही मदत घेतली जात आहे. तरीही अनेकांकडून त्याचे पालन होत नसल्याने पोलिसांकडून नाईलाजाने कारवाई केली जात आहे. कारवाईची तीव्रता वाढत चालली असून या सहा दिवसांच्या कालावधीत २५ जणांना नोटीस देऊन सोडण्यात आले.