शेतकरी विरोधात ट्विट केल्याने कंगनावर कर्नाटकात FIR दाखल
मुंबई – अभिनेत्री कंगना राणावत हिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. या वादग्रस्त वक्तव्यावरुन शिवसेना आणि कंगनामध्ये प्रचंड वाद झाला होता.आता पुन्हा एकदा कंगनाने वादग्रस्त विधान केले आहे. कंगनाला तिचेच एक वादग्रस्त वक्तव्य भोवले असून, कर्नाटकातील न्यायालयाने पोलिसांना तिच्यावर एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले होते. अखेर तिच्यावर एफआयआर दाखल झाला असून, यामुळे ती आता चांगलीच अडचणीत आली आहे.
कंगनाने मुंबईबद्दल वादग्रस्त वक्तव्य करुन वाद ओढवून घेतला होता. यामुळे कंगना आणि शिवसेना यांच्यात रोज जोरदार सामना रंगला होता. यात कंगनाच्या बाजूने भाजप नेते मैदानात उतरले होते. तिने थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. तिने राज्यपालांसमोर गाऱ्हाणे मांडून, न्याय देण्याची मागणी केली होती. त्यानंतर कंगना मुंबई सोडून हिमाचल प्रदेशला तिच्या घरी परतली होती. तेथूनही तिने ट्विटरवर वादग्रस्त वक्तव्यांची मालिका कायम ठेवली होती.
या प्रकरणी वकील एल. रमेश नाईक यांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. कंगनाने शेतकरीविरोधी ट्विट केले असून, तिच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली होती. यावर न्यायाधीशांनी पोलिसांना या प्रकरणी कंगनावर एफआयआर दाखल करुन चौकसी करण्याचे निर्देश दिले आहेत. या ट्विटमुळे भावना दुखावल्याचे नाईक यांनी म्हटले आहे.