शिर्डी वादासंदर्भात CM ठाकरेंसोबतच्या चर्चेनंतर विखे-पाटील म्हणाले…
मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर शिर्डीचे ग्रामस्थ समाधानी असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. साईबाबांच्या जन्मस्थळाच्या वादासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहावर शिर्डीकरांशी चर्चा केली. या बैठकीनंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, राज्यातील कोणत्याही तिर्थक्षेत्राच्या विकासाला आमचा विरोध नाही. साई जन्मस्थळाच्या वादासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत झालेली चर्चा समाधानकारक होती. ग्रामस्थ समाधानी असून शिर्डी बंद आंदोलन मागे घेत आहोत, अशी घोषणाही विखे पाटील यांनी केली.
मुख्यमंत्र्यांसोहत नेमकी काय चर्चा झाली हे बोलण्यास मात्र त्यांनी नकार दिला. यासंदर्भात सरकारची भूमिका काय? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यावर सरकारची भूमिका मुख्यमंत्री स्पष्ट करतील, असे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले आहे. परभणीतील पाथरीचा साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून विकास करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर वादाला तोंड फुटले होते.