breaking-newsताज्या घडामोडीलेख

शहीद सावित्रीबाई : नेतृत्व, सेवाभाव आणि शौर्यगाथा  – प्रा. हरी नरके

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा उद्या १९० वा जन्मदिवस. अस्पृश्य मुलाला पाठीवर घेऊन पायी ८ किलोमीटर धावतपळत सावित्रीबाई दवाखान्यात पोचल्या. त्यातच त्यांना प्लेगची बाधा झाली आणि १० मार्च १८९७ ला रात्री ९ च्या सुमारास त्यांचं प्लेगमुळे निधन झालं. आपल्या दत्तक पुत्राला पाठीवर घेऊन स्वत:च्या गादीसाठी-संस्थानासाठी लढणार्‍या झाशीच्या राणी लक्ष्मीबाईच्या ‘वीरगाथा’ गौरवाने सांगितल्या जातात. तथापि आजारी अपृश्य मुलाला पाठीवर घेऊन वाचवणार्‍या आणि स्वत: शहीद होणार्‍या या शौर्यांगणेची कहाणी मात्र पाठ्यपुस्तकांत येत नाही. समाजधुरीणांकडून त्यावर मौनाचा कट केला जातो.

ज्ञानज्योती सावित्रीबाई १८४८ ते १८९७ अशी सलग ५० वर्षे लोकांसाठी राबत होत्या. सेवा आणि करुणेचा एक अनोखा आदर्श त्यांनी घालून दिला. बालहत्त्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह, दुष्काळात १००० गरिब मुलांचे संगोपन करणे आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपनाविरुद्ध नाव्ह्यांचा संप घडवणे या ४ कामांत सावित्रीने आपले नेतृत्व केले अशी कबुली दस्तुरखुद्द जोतीराव देतात, यातनं सावित्रीबाईंचं ऎतिहासिक योगदान अधोरेखित होतं.

राजकीय ऋषी नारायण महादेव उर्फ मामा परमानंद यांनी सयाजीराव गायकवाडांना लिहिलेल्या पत्रात सावित्रीबाईंबद्दल म्हटले आहे की, ‘जोतिरावांपेक्षा त्यांच्या पत्नीचे कौतुक करावे तेवढे थोडेच होईल. तिची योग्यता काय सांगावी? आपल्या पतीबरोबर तिने संपूर्ण सहकार्य केले आणि त्यांच्याबरोबर राहून वाट्यास येतील त्या हालअपेष्टा भोगल्या. उच्चवर्णीयांतील उच्चशिक्षण घेतलेल्या स्त्रियांतही अशा प्रकारची त्यागी स्त्री आढळून येणे कठीण आहे. त्या उभयतांनी लोककार्यार्थ आपले सारे जीवन खर्च केले.’ (३१ जुलै १८९०)

जोतीराव सावित्रीबाईंची ‘विषयपत्रिका’
शिक्षण, स्त्रीपुरूष समता, सामाजिक न्याय या विषयांची “सावित्री- जोती” यांनी लिहिलेली ‘विषयपत्रिका’ आजही मार्गदर्शक आहे. त्यांचं समग्र क्रांतिकारी चिंतन आजही प्रस्तुत असल्याचं दिसून येतं. त्यामुळेच त्यांच्या जीवनकार्य आणि विचारांबद्दल समाजाच्या सर्व स्थरात विशेष रस वाटू लागला. आज जो त्यांचा अभ्यास चालू आहे, त्यामागे हे समाजशास्त्रीय वास्तव दडलेलंय.
राज्य शासनाने प्रकाशित केलेले सावित्रीबाई फुले :समग्र वाड्मय आणि सावित्रीबाई फुले : गौरवग्रंथ यांना प्रचंड मागणी आहे. प्रस्तुत लेखकाने लिहिलेले सावित्रीबाईंचे इंग्रजी चरित्र दिल्लीच्या एन.सी.ई.आर.टी. ने प्रकाशित केलेले असून त्याचा मराठी अनुवाद इस्लामपूरच्या नाग नालंदा प्रकाशनाने छापलेला आहे. या पुस्तकाचे अनुवाद अनेक भारतीय भाषांमध्ये झालेले आहेत.
मुंबईच्या कु. शांताबाई रघुनाथ बनकर यांची १९३९ मधे प्रकाशित झालेली ‘सावित्रीबाई जोतीराव फुले यांचे अल्पचरित्र’ ही पुस्तिका आणि त्यानंतर १९६६ साली सौ. फुलवंताबाई झोडगे यांनी लिहिलेलं ‘क्रांतिदेवता साध्वी सावित्रीबाई फुले’ हे चरित्र महत्त्वाचं आहे. त्यांनाच वाट पुसत डॉ. मा. गो. माळी यांनी ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले’ हा चरित्रग्रंथ १९८० साली लिहिला. डॉ. कृ. पं. देशपांडे यांनी सावित्रीबाईंच्या जीवन आणि साहित्यावर ‘अग्निाफुले’ हा ग्रंथ १९८२ साली प्रकाशित केला. नंतरचे सगळे ग्रंथ याच माहितीवर आधारित आहे.

सावित्रीबाईंचा जन्म ३ जानेवारी १८३१ ला झाला. पुण्यापासून जवळपास ५० किलोमीटरवर नायगाव हे त्यांचं जन्मगाव आहे. पुणे-सातारा रस्त्यावर शिरवळपासून ५ किलोमीटरवर हे गाव वसलेलं आहे. सावित्रीबाई या खंडोजी नेवशे यांच्या ज्येष्ठ कन्या होत. १८४० साली वयाच्या १० व्या वर्षी त्यांचं जोतीरावांशी लग्न झालं. ११ एप्रिल १८२७ ला पुण्यात जन्मलेले जोतीराव त्यावेळी १३ वर्षांचे होते. सावित्रीबाईंच्या जन्मस्थळाची अतिशय दुरावस्था होती. त्याची मुळाबरहुकुम पुनरउभारणी करणे, या गावाचा संपुर्ण कायापालट घडवणे, गावात शिल्पसृष्टी उभारणे, महाराष्ट्रातल्या कोणत्याही खेड्यात नसलेल्या असंख्य गोष्टी या गावात उपलब्ध करून देणे यासाठी प्रस्तुत लेखकाची २० वर्षे सत्कर्मी लागली याचा मला अभिमान आहे. पुण्यातल्या महात्मा फुलेवाड्याचा समग्र विकास, दिल्लीच्या संसद भवनात महात्मा फुले यांचा पुर्णाकृती पुतळा उभारणे आणि पुणे विद्यापीठाचा नामविस्तार अशा बर्‍याच कामांमध्ये पुढाकार आणि यशप्राप्ती यांचा आनंद आयुष्यभरासाठी पुरणारा आहे. फुलेवाडा व नायगावला श्री. छगन भुजबळ यांना २८ वर्षांपुर्वी सर्वप्रथम घेऊन जाणे, त्यांच्याकडे व शासनाकडे या व इतर असंख्य कामांसाठी आग्रही राहणे, पाठपुरावा करून स्वत: राबून ही कामे करवून घेणे यात आयुष्याचे सार्थक आहे असे मी मानतो.

लग्नानंतर जोतीरावांनी सावित्रीबाईंना घरीच शिक्षण दिल्याचं शासकीय कागदपत्रांवरून दिसून येतं. १ मे १८५१ ते ३० एप्रिल १८५२ च्या शैक्षणिक अहवालात म्हटल्याप्रमाणे, ‘जोतीरावांनी स्वत:च्या पत्नीला घरी शिक्षण देऊन शिक्षिका बनवले.’ २२ नोव्हेंबर, १९५१ च्या ‘बॉम्बे गार्डियन’ वृत्तपत्रातल्या बातमीवरून सावित्रीबाईंच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी जोतीरावांचे मित्र सखाराम यशवंत परांजपे आणि केशव शिवराम भवाळकर (जोशी) यांनी घेतल्याचं दिसतं. सावित्रीबाईंनी अहमदनगर इथे फॅरारबाईंच्या आणि पुण्यात मिचेलबाईंच्या नॉर्मल स्कूलमधे अध्यापनाचं प्रशिक्षणही घेतलं. त्यामुळे सावित्रीबाई याच आद्य भारतीय शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत, हे तत्कालीन दस्तऐवजांवरून स्पष्ट होतं. हीच देशाची खरी ज्ञानज्योती होय.

शेण नाही, ही तर फुलं आहेत
सावित्रीबाईंनी शिकवण्यासाठी घराच्या उंबरठ्याबाहेर टाकलेलं पहिलं पाऊल हीच आधुनिक भारतीय स्त्रीच्या सार्वजनिक जीवनाची सुरवात होय. समाजाकडून होणारा कडवा विरोध सहन करीत आणि शिव्याशाप शांतपणे ऐकत सावित्रीबाई काम करत होत्या. त्या शाळेत जाता येताना सनातनी गुंड, टोळभैरव मुद्दाम रस्त्यावर थांबत. अचकट-विचकट बोलत. कधीकधी दगड मारीत. अंगावर चिखल किंवा शेण टाकीत असत.

शाळेत जाताना सावित्रीबाईंना सोबत २ साड्या न्याव्या लागत. रस्त्याने जाताना खराब झालेली साडी शाळेत गेल्याबरोबर बदलावी लागे. दुसरी परतताना खराब होई आणि तरीही सावित्रीबाई आपल्या कामात खंड पडू देत नव्हत्या. हा छळ असाच चालू राहिल्याने त्यांच्या आणि लहान मुलींच्या संरक्षणासाठी संस्थेने एका शिपायाची नियुक्ती केली.

त्याने लिहून ठेवलेल्या आठवणीनुसार सावित्रीबाई आपल्या अंगावर दगड किंवा चिखल फेकणार्‍यांना म्हणत, ‘मी माझ्या भगिनींना शिकविण्याचे पवित्र कार्य करीत असताना तुम्ही माझ्यावर शेण अगर खडे फेकीत आहात, ही मला फुलेच वाटतात. ईश्वपर तुम्हाला सुखी ठेवो!’ बळवंत सखाराम कोल्हे यांच्या या आठवणी सावित्रीबाईंच्या धैर्यावर प्रकाश टाकणार्‍या आहेत.

ब्राम्हण विधवांसाठी बालहत्या प्रतिबंधक गृह
१८६३ मधे जोतीराव सावित्रीबाईंनी विधवांसाठी ‘बालहत्या प्रतिबंधक गृह’ सुरू केलं. याबाबतची अस्सल माहिती अलीकडेच उपलब्ध झालीय. एक तर हे गृह फक्तर ‘ब्राह्मण विधवांसाठीच’ सुरू करण्यात आलेलं होतं आणि त्यात सावित्रीबाईंचा पुढाकार होता. ४ डिसेंबर १८८४ ला जोतीरावांनी मुंबई सरकारच्या अवर सचिवाला लिहिलेल्या पत्रात याबाबतची सगळी माहिती नोंदवलेली आहे.

जोतीराव सावित्रीबाईंनी स्वत:च्या घरात एक वसतिगृह चालवलं. दूरदूरहून मुलं शिक्षणासाठी तिथे येत असत. लक्ष्मण कराडी जाया या मुंबईच्या विद्यार्थ्याने या वसतिगृहात राहून सावित्रीबाईंच्या मायेची पाखरण अनुभवली होती. त्याने आठवणीत म्हटलंय, ‘सावित्रीबाईंसारखी दयाळू व प्रेमळ अंत:करणाची स्त्री मी अजूनसुद्धा कोठे पाहिली नाही. त्या आम्हा मुलांवर आईपेक्षासुद्धा जास्त प्रेम करीत असत.’

दुसर्‍या एका मुलाने आपल्या आठवणींमधे सावित्रीबाईंचा स्वभाव, त्यांची साधी राहणी आणि जोतीराव सावित्रीबाईंचे परस्परांवरील अपार प्रेम यांची विलक्षण हृदय नोंद केलीय.

बरोबर काय न्यायचं आहे?
हा महादू सहादू वाघोले लिहितो, ‘सावित्रीबाई फारच उदार होती. तिचे अंत:करण दयेने भरलेले होते. गोरगरिबांवर ती फार दया करी. ती अन्नदान पण फार करी. ती कोणासही जेऊ घाली. गरीब बायांची अंगावरची फाटलेली लुगडी पाहून त्यांना ती आपल्या घरातील लुगडी देई. त्यामुळे तात्यांचा खर्च फार होत असे. एखादेवेळी तात्या तिला म्हणत, ‘इतका खर्च करू नये.’ त्यावर ती शांतपणे बारीक हसत असे आणि ‘बरोबर काय न्यायचे आहे?’ असे तात्यांना विचारीत असे. त्यावर तात्या शांतमुद्रेने थोडावेळ गप्प बसत असत. ते दोघे एकमेकांवर अतिशय प्रेम करीत असत.’ जोतीराव तापट तर सावित्रीबाई स्मितभाषी. जोतीराव आयुष्यात एकदाही सावित्रीबाईवर रागावल्याचे उदाहरण नाही.

सावित्रीबाईंना स्त्रीजातीच्या उन्नतीची फार कळकळ असे. त्या सुस्वरूप आणि मध्यम बांध्याच्या होत्या. त्यांची मुद्रा नेहमी शांत असे. राग म्हणून काय चीज आहे, ती या बाईच्या गावीच नव्हती. ती नेहमीच हसतमुख असे. मात्र तिचं हसू गालांवर तेवढे दिसून येईल इतकेच ते मर्यादित असे. सावित्रीबाईंना सर्व लोक काकू म्हणत असत. पाहुणे मंडळी घरी आली म्हणजे तिला कोण आनंद होत असे. त्यांच्याकरिता मोठ्या आवडीने ती गोडधोड जेवण करीत असे.

जोतीराव सावित्रीबाईंना मोठा मान देत असत. तिला ते बोलताना ‘अहो जाहो’ या बहुमानदर्श शब्दांनी हाका मारीत असत. सावित्रीबाई उत्तर आयुष्यात तात्यांना ‘शेटजी’ म्हणत. या दोघांत पतीपत्नीत्वाचं खरे प्रेम भरलेलं होतं. सावित्रीबाईंनी नको म्हटलेले काम तात्या कधीही करत नसत. सावित्रीबाई सुविचारी आणि दूरदृष्टीची होती. तिच्याविषयी आप्तयजनांत मोठा आदर होता.

पुण्यातल्या शिकलेल्या बायकांचा घरी राबता
मुलींच्या शाळांतून तिने शिक्षिकेचे काम केलेलं असल्यामुळे स्त्रीशिक्षणाचा विस्तार झाल्यानंतर सुशिक्षित बायांत तिच्याविषयी पूज्यभाव वाढलेला दिसत होता. तिच्याकडे आलेल्या मुलींना आणि स्त्रियांना ती नेहमी सदुपदेश करीत असे. पुण्यातील मोठमोठ्या सुशिक्षित बाया, पंडिता रमाबाई, डॉ. आनंदीबाई जोशी आणि रमाबाई रानडे तिच्या भेटीस येत असत.

सावित्रीबाईंचा पोषाख तात्यांप्रमाणेच अगदी साधा असे. तिच्या अंगावर अलंकार नसत. तिच्या गळ्यात एक पोत आणि मंगळसूत्र असे. कपाळावर भलंमोठं कुंकू लावलेलं असे. रोज सकाळी त्या सूर्योदयापूर्वी आंघोळ करून सडासंमार्जन उरकून घेत. त्यांचं घर नेहमी स्वच्छ असे. काकूंना दिवाणखान्यात थोडाही केर अथवा धूळ पडलेली खपत नसे. त्यांच्या घरातील भांडी आणि इतर सामान स्वच्छ असून टापटीपीने ठेवलेलं असे. त्या स्वयंपाक स्वत: करीत. तात्यांच्या खाण्याची आणि प्रकृतीची त्या फार काळजी घेत.

जोतीरावांच्या पश्चात सावित्रीबाईंनी सत्यशोधक चळवळीचं नेतृत्व केलं. शेवटपर्यंत त्या काम करीत राहिल्या. यशवंत डॉक्टर झाल्यानंतर मिलिट्रीत नोकरीला लागला. त्याला नोकरीनिमित्त अनेक देशात जावं लागलं. त्याची बायको राधा उर्फ लक्ष्मी हिचं ६ मार्च १८९५ ला पुरात वाहून गेल्यानं निधन झालं. सावित्रीबाई घरी एकट्या उरल्या. यशवंत नोकरीनिमित्त त्यावेळी परदेशात होता. पुढे त्याने दुसरा विवाह केला. त्याला एक मुलगी झाली. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या बायकोचे व मुलीचे फार हाल झाले. या मुलीली एका सापत्य बिजवराशी लग्न करावे लागले. त्याच्य पत्नीला बेवारस स्थितीत फूटपाथवर मृत्यू आला. तिच्या मदतीला तिची पोटची पोरही आली नाही. या मुलीचे आजचे वारसदार आपण सावित्री-जोतीचे जैविक वारस असल्याचा डांगोरा पिटीत असतात. अर्थात त्यांनाही आपण जैविक वारस आहोत ही माहिती प्रस्तुत लेखकाच्या पुस्तकातून मिळालेली आहे.

प्लेगच्या साथीत लोकांचे जीव वाचवण्याची धडपड
१८९३ मधे सासवड येथे झालेल्या सत्यशोधक परिषदेचे अध्यक्षस्थान सावित्रीबाईंनी भूषवलं. १८९६ च्या दुष्काळात सावित्रीबाई खूप राबल्या. १८९७ साल उजाडलं तेच प्लेगचं थैमान घेऊन. पुणे परिसरात दररोज शेकडो माणसं मरू लागली. सरकारने रँड या अधिकार्‍याच्या नेतृत्वाखाली प्लेगचा बंदोबस्त करण्याचं काम हाती घेतलं.

सावित्रीबाईंनी डॉ. यशवंतला रजा काढून बोलावून घेतलं आणि हडपसर-महंमदवाडीला ससाण्यांच्या माळरानावर त्यांनी डॉ. यशवंतला दवाखाना घालायला लावला. त्या स्वत: आजारी माणसांना उचलून दवाखान्यात आणीत, त्यांच्यावर उपचार करीत. हा रोग संसर्गजन्य आहे हे माहीत असूनही त्या रुग्णांची सेवाशुश्रूषा करीत होत्या. मुंढवा गावच्या गावकुसाबाहेरच्या महारवाड्यात पांडुरंग बाबाजी गायकवाड या मुलाला प्लेगची लागण झाल्याचे कळताच सावित्रीबाई तिकडे धावल्या.

मुलाला पाठीवर घेऊन पायी ८ किलोमीटर धावतपळत त्या दवाखान्यात पोचल्या. त्यातच सावित्रीबाईंना प्लेगची बाधा झाली आणि १० मार्च १८९७ ला रात्री ९ च्या सुमारास त्यांचं प्लेगमुळे निधन झालं. आपल्या दत्तक पुत्राला पाठीवर घेऊन स्वत:च्या गादीसाठी-संस्थानासाठी लढणार्‍या झाशीच्या राणी लक्ष्मीबाईच्या ‘वीरगाथा’ गौरवाने सांगितल्या जातात. तथापि आजारी अपृश्य मुलाला पाठीवर घेऊन वाचवणार्‍या आणि स्वत: शहीद होणार्‍या या शौर्यांगणेची कहाणी मात्र पाठ्यपुस्तकांत येत नाही. समाजधुरीणांकडून त्यावर मौनाचा कट केला जातो.

ज्ञानज्योती सावित्रीबाई १८४८ ते १८९७ अशी सलग ५० वर्षे लोकांसाठी राबत होत्या. सेवा आणि करुणेचा एक अनोखा आदर्श त्यांनी घालून दिला. बालहत्त्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह, दुष्काळात १००० गरिब मुलांचे संगोपन करणे आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपनाविरुद्ध नाव्ह्यांचा संप घडवणे या ४ कामांत सावित्रीने आपले नेतृत्व केले अशी कबुली दस्तुरखुद्द जोतीराव देतात, यातनं सावित्रीबाईंचं ऎतिहासिक योगदान अधोरेखित होतं.

– प्रा. हरी नरके, २ जानेवारी २०२०

(फेसबूक वॉलवरून साभार)

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button