मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा
मुंबई | परतीच्या पावसाने मुंबईला चांगलेच झोडपून काढले आहे. काल रात्रीपासून पडणारा पाऊस दिवसभर कोसळत आहे. त्यामुळे सकल भागात पाणी साचले आहे. काही ठिकाणी घरांमध्ये आणि काही रुग्णालयात पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांसह रुग्णांची एकच तारांबळ उडाली आहे. दरम्यान, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, आपला जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन मुंबई महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
जोरदार पाऊस कोसळत असल्याने खबरदारी म्हणून मुंबईत पाच एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत आहे. दरम्यान, झवेरी बाजारमध्ये दागिन्यांच्या दुकानात पाणी साचलंय. त्यामुळे दागिन्यांचं नुकसान झाले आहे. सायन परिसरातही चांगलंच पाणी तुंबलं होतं. सायनमधील गांधी मार्केट परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. अनेक गाड्या या पाण्यात अडकल्या होत्या. शिवडीमधल्या बीडीडी चाळीतही पावसाचे पाणी शिरले. याठिकाणी घरांमध्ये पाणीच पाणी झाले होते. गाड्या देखील पाण्यात असल्याचं पाहायला मिळाले.