विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू
मुंबई – राज्यात शाऴा आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. 23 नोव्हेंबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. यासंदर्भात एसओपी तयार करण्यात आला असून त्याबाबत केवळ मुख्यमंत्र्यांकडून मंजूरी मिळणं बाकी आहे.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात एसओपी देखील तयार करण्यात आला आहे. कशा पद्धतीनं शाळा सुरू करण्याचं नियोजन असेल याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
एसओपी मंजूर झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तर इयत्ता 10 वी 12 वीच्या परीक्षा मे महिन्यातच होतील, अशी माहिती देखील यावेळी त्यांनी दिली आहे.
शाळा सुरू करण्याआधी पालकांची परवानगी देखील घेतली जाणार आहे. यासंदर्भात पालकांच्या परवानगीनेच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्याबाबत नियोजन करण्यात आलं आहे, अशीही माहिती मंत्री गायकवाड यांनी दिली आहे.