राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवसांचा आठवडा
मुंबई | राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून आता केवळ 5 दिवस काम करावे लागणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कॅबिनेटने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुखद असा निर्णय घेतला आहे. 29 फेब्रुवारीपासून 5 दिवसांच्या आठवड्याच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. यामध्ये सोमवार ते शुक्रवार पर्यंत सरकारी कामे केली जातील.
तसेच शनिवार व रविवार असे दोन दिवस आठवडी सुटी असणार आहे. राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये बुधवारी हा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील अनेक खासगी कंपन्यांमध्ये 5 दिवसांच्या आठवड्याची पद्धत आहे. परंतु, अशा कंपन्यांपैकी अनेक ठिकाणी हेच 5 दिवस कर्मचाऱ्यांकडून 8 तास नाही तर 9 तास काम करून घेतले जाते. सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामाचे स्वरूप कसे राहील हे अद्याप सांगण्यात आलेले नाही.
तसेच सरकारकडून यासंदर्भात अधिकृत माहिती सुद्धा जारी करण्यात आलेली नाही. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा निश्चितच सुखद निर्णय आहे. परंतु, केंद्र सरकार असो वा राज्य सरकार, सरकारी कामावर नेहमीच दप्तर दिरंगाईची टीका केली जाते. अशात राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा कामाचा आठवडा 6 दिवसांवरून 5 दिवस करण्यावर टीका होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.