‘सोनिया गांधी, मायावतींचा भारतरत्नने सन्मान करावा’, हरीश रावत यांची मागणी
भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या ‘भारतरत्न’ने काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी आणि बहुजन समाजवादी पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांचा सन्मान करावा, अशी मागणी काँग्रेस नेते आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी केली आहे. हरीश रावत यांनी ट्वीट करुन केंद्र सरकारकडे ही मागणी केली आहे. राजकारण आणि समाजकारणातील महिला शक्तीचा आदर करत सोनिया गांधी आणि मायावती यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, असं मत रावत यांनी व्यक्त केलं आहे.
‘दोन्ही व्यक्ती या प्रखर राजकारणी आहे. त्यांच्या राजकारणाशी कुणी सहमत किंवा असहमत होऊ शकतं. पण सोनिया गांधी यांनी भारतीय महिलांचे सामाजिक स्थान आणि सामाजिक समर्पण, तसंच जनससेवेच्या मापदंडांना नवी उंची आणि आदर मिळवून दिला आहे,’ असं रावत यांनी म्हटलंय.
‘मायावती यांनी अनेक वर्षांपासून पीडित-शोषित वर्गाच्या मनात एक विश्वास निर्माण केला आहे. भारत सरकारने या दोन्ही व्यक्तीमत्वांचा सन्मान भारतरत्न पुरस्काराने करायला हवा,’ असं रावत यांनी बसपा अध्यक्षा मायावती यांच्याबद्दल म्हटलं.