अर्थव्यवस्था संकटात नाही – निर्मला सीतारमण
दिल्ली | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थव्यवस्था संकटात असल्याचा विरोधकांचा आरोप फेटाळून लावला. त्यांनी लोकसभेत मंगळवारी सांगितले की, सरकारच्या पावलांमुळे अर्थव्यवस्था ५ लाख कोटी डॉलरची होण्याच्या दिशेने पुढे जात आहे. आर्थिक घडामोडीतील सुधारणांचे स्पष्ट संकेत दिसू लागले आहेत. त्यानुसार अर्थव्यवस्था संकटात नाही.
आर्थिक क्षेत्रातील प्रत्येक मापदंडावर अर्थव्यवस्था पुढे जात आहे. मॅन्युफॅक्चरिंग(निर्मिती) क्षेत्राचे उत्पादन वाढत आहे. जीएसटी संकलनातही वाढ झाली आहे. अर्थमंत्री लोकसभेत अर्थसंकल्पावर १२ तास चाललेल्या चर्चेला उत्तर देत होत्या. त्यांनी सांगितले की, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दहा महिन्यांत जानेवारीपर्यंत जीएसटी संकलन सहा महिने १ लाख कोटी रुपयांहून जास्त राहिले.
नोव्हेंबर २०१९ मध्ये यात ६%, डिसेंबर २०१९ मध्ये ९% आणि जानेवारी २०२० मध्ये १२% ची वृद्धी नोंदली आहे. गेल्या जानेवारीत हे १,०३,१८४ कोटी रु. राहिले. शेअर बाजार अर्थव्यवस्थेत सलग विश्वास दाखवत आहे. चालू वित्त वर्षात ३१ जानेवारी २०२० पर्यंत हा ५.६% वाढला होता. हे सर्व संकेत अर्थव्यवस्थेतील सुधारणा दर्शवतात.
त्यांनी सांगितले,सरकारने गुंतवणूक वाढवण्यासाठी १३ उपाय आणि रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाद्वारे जास्त रोकड उपलब्ध करण्याचे उपाय केले आहेत.