राज्य सरकारकडून रेल्वे सुरु करण्याबाबत रेल्वे मंत्रालयाला मागणी आली नाही – पीयुष गोयल
मुंबई – राज्यात सरकार सर्व बाबी पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे मुंबईकर आणि मुंबईच्या आसपासच्या महानगरातील सर्व चाकरमानी मुंबई लोकल कधी सुरू होते याच्या प्रतीक्षेत आहेत. असे असतानाचा काल (३ ऑक्टोबर) रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी एक मोठा खुलासा केला आहे. रेल्वे सुरू करण्याबाबत राज्य सरकारकडून रेल्वे मंत्रालयाला अजून कोणतीही मागणी आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबई लोकल कधी सुरू होईल याबाबत अस्पष्टता निर्माण झाली आहे.
केंद्राने केलेल्या नव्या कृषी कायद्यातील गैरसमज दूर करून महत्त्वाचे मुद्दे सांगण्यासाठी काल केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी मुंबई लोकल कधी सुरू होणार असा प्रश्न त्यांना विचारला असता, मुंबई लोकल सुरू करण्यासाठी राज्य सरकारचा अजून कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जोपर्यंत राज्यसरकार प्रस्ताव पाठवत नाही तोपर्यंत आम्ही निर्णय घेऊ शकत नाही असे रेल्वे मंत्रालयाने आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुंबई लोकल 15 तारखेपर्यंत सुरू करू असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले असले तरी त्यासाठी राज्य सरकार रेल्वे मंत्रालयाला कधी प्रस्ताव पाठवणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
“सर्वात पहिली किसान स्पेशल ट्रेन आम्ही सुरू केली, ती देखील महाराष्ट्रतील देवळाली इथून, सुरुवातीला तिला अजिबात रिस्पॉन्स मिळाला नाही. मात्र त्यानंतर सर्व ट्रेन भरभरून जात आहेत. शेतकऱ्यांचा माल हा थेट रेल्वे घेऊन जाईल, आता नितीन गडकरी यांनी मागणी केलीये. नागपूरला आता संत्र्याचा सीजन सुरू होईल, त्यामुळे तिथून किसान रेल चालवा, आम्ही त्याची प्लॅनिंग आता करतो आहोत”, असे गोयल म्हणाले आहेत.