प्रियांका गांधींच टेलिकॉम कंपन्यांना पत्र,प्रवासी कामगारांना एक महिन्यांपर्यंत मोफत कॉलची सेवा देण्याची मागणी
कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. त्यामुळे हजारो कामगार वाहतूक बंद असतानाही आपापल्या गावाकडे जाऊ लागले आहेत. बहुतांश कामगार हे रोजंदारीवर काम करणारे आहेत. याचदरम्यान काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी टेलिकॉम कंपन्यांना पत्र लिहून प्रवासी कामगारांना एक महिन्यांपर्यंत मोफत इनकमिंग-आऊटगोईंग कॉल करण्याची सुविधा देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
एएनआय’ ने दिलेल्या वृत्तानुसार प्रियांका गांधी यांनी जियो कंपनीचे प्रमुख मुकेश अंबानी, व्होडाफोन आणि आयडियाचे कुमारमंगलम बिर्ला, बीएसएनएलचे पी के पुरवार, एअरटेलचे सुनील भारती मित्तल यांना पत्र लिहून मजुरांसाठी त्यांच्या नेटवर्कवर एक महिन्यांपर्यंत इनकमिंग-आऊटगोईंगची सुविधा मोफत करण्याची आग्रही मागणी केली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अशात सर्व कंपन्यांचा कारभारही ठप्प झाला आहे. त्यामुळे लोक शहरातून आपल्या गावाकडे जात आहेत. यावेळी या लोकांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. हजारोंच्या संख्येने लोक आपल्या घरी चालत निघाले आहेत. त्यांच्यासमोर जीवन-मरणाचा प्रश्न आ-वासून उभा राहिला आहे.
त्यामुळे प्रियांका गांधी यांनी दूरसंचार कंपन्यांच्या प्रमुखांना पत्र लिहून महिनाभरासाठी इनकमिंग-आऊटगोईंगची सुविधा निशूल्क करण्याची मागणी केली आहे…