राज्यात येत्या सात दिवसात पावसाचा जोर वाढणार; कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता
राज्यात येत्या सात दिवसात पावसाचा जोर वाढणार असून कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेले काही दोन दिवस राठवाड्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. राज्यातील इतर भागांमध्ये पावसाची रिपरिप सुरुच आहे. मुंबई-ठाण्यासह उपनगरामध्येही उसंत घेतलेल्या पावसाची पुन्हा संततधार सुरु झाली आहे. दरम्यान येत्या आठवड्यात मुंबईसह उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. शिवाय, पावसाच्या हलक्या सरी पडतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात १८ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या २४ तासात पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रात पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या सात दिवसात संपूर्ण राज्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस असणार आहे.
विदर्भ-मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये गेल्या दोन दिवसात मुसळधार पाऊस पडल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. काही गावांचा संपर्क देखील तुटला होता. तर बुधवारी परभणी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्याने अनेक भागात पूर आला होता.