भिवंडी इमारत दुर्घटनेत आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू, ४५ तासांनंतर शोधमोहीम बंद
आत्तापर्यंत १८ जणांना बाहेर काढण्यात आले
मुंबई : ठाण्यातील भिवंडीमध्ये शनिवारी तीन मजली इमारत कोसळ्याची घटना घडली होती. या घटनेत आत्ता पर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर आत्तापर्यंत १८ जणांना बाहेर काढण्यात आले आहे. यापैकी १० जणांना वाचवण्यात NDRF च्या पथकाला यश आलं आहे.
भिवंडीतील इमारत कोसळलेल्या ठिकाणी शोध आणि बचाव मोहीम ४५ तासांनंतर बंद घोषित करण्यात आली आहे. एकूण ८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
अग्निशमन दल, पोलीस, टार्गेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (TDRF) आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) च्या पथके ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी घटनास्थळी हजर आहेत.
जखमींना शनिवारी इंदिरा गांधी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. इमारत कोसळून जखमी झालेल्यांची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.