यवतमाळ जिल्ह्यात दाखल झालेल्या 21 हजार नागरिकांची आरोग्य तपासणी
यवतमाळ । महाईन्यूज । प्रतिनिधी
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनाने त्यांच्या परतीचा मार्ग मोकळा केला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अडलेले नागरिक, विद्यार्थी, मजूर आदी स्वगृही परत येत आहे. यवतमाळ जिल्ह्यातही बाहेरच्या राज्यातून तसेच इतर जिल्ह्यातून नागरिक आले आहे. या नागरिकांची आरोग्य विषयक तपासणी करण्याचे शासनाचे निर्देश आहे. त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यात स्वगृही परतलेल्या 20 हजार 800 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.
लॉकडाऊनच्या तिस-या टप्प्याला सुरवात होताच जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनीसुध्दा इतर राज्यांचे सचिव, संबंधित जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला. प्रशासनाकडून सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर अडकलेले नागरिक आता स्वगृही येत आहे. जिल्ह्यात परत येणा-याची तालुकास्तरीय समितीमार्फत वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना 14 दिवस गृह विलगीकरणात राहणे बंधनकारक आहे. यानुसार यवतमाळ जिल्ह्यात बाहेरच्या राज्यातून 3818 नागरिक तर महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातून 16982 असे एकूण 20800 नागरिक स्वगृही आले आहेत. संबंधित तालुक्याच्या ठिकाणी तालुकास्तरीय समितीच्या माध्यमातून त्यांची आरोग्य विषयक तपासणी होत आहे. यात ताप, सर्दी, खोकला व इतर बाबींची तपासणी केली जाते.
आतापर्यंत जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून 39 बसेसद्वारे जिल्ह्यात अडकून पडलेले 749 मजूर इतर जिल्ह्यात पाठविण्यात आले आहे. तर 27 बसेसने इतर जिल्ह्यातून 539 मजूर यवतमाळात दाखल झाले आहे. सोबतच जिल्ह्यातील 1805 मजूरांना रेल्वेने त्यांच्या राज्यात पाठविले आहे. अमरावती आणि अकोला येथून हे मजूर रेल्वेने त्या त्या राज्यात रवाना करण्यात आले. यात उत्तर प्रदेश (467), बिहार (360), झारखंड (780), मध्यप्रदेश (372), हिमाचल प्रदेश (23), जम्मू आणि काश्मिर (17), पंजाब (7) येथील मजुरांचा समावेश आहे. याचा संपूर्ण खर्च जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आला आहे. covid१९. mhpolice.in ही पास घेऊन 21159 व्यक्ती इतर जिल्ह्यात गेले असून या पासच्या आधारे 10293 जण यवतमाळात दाखल झाले आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.